कल्याण – कल्याण, टिटवाळा शहरांच्या विविध भागात गांजाची चोरून विक्री करणाऱ्या तीन गांजा तस्करांना पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी विविध भागातून अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून लाखो रूपये किमतीचा दीड किलोहून अधिक किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत सोनावणे टाॅवर समोरील रस्त्यावर मोकळ्या मैदानाजवळून प्रथम तुकाराम गायकवाड (२३) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो कल्याण पूर्वेतील जरीमरी मंदिर रस्ता, तिसगाव भागात राहतो. त्याच्याकडून एक किलोहून अधिक किंमतीचा विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत कोळीवाडा भागात बकरी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोपाळ गणपत भिडे या इसमाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३७० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली बनेली रस्त्यावर शहानवाज हुसेन इराणी (६५)या महिलेला पोलिसांनी गांजाची तस्करी करताना अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी ४५५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही महिला आंबिवली इराणी वस्तीमध्ये राहते. पोलीस उपायुक्तांचे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून या गांजा तस्करांना अटक केली आहे.
गेल्या वर्षापासून कल्याण डोंबिवली हद्दीत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नशामुक्त शहर अभियान सुरू केले आहे. त्यामुळे शहरात दररोज अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुध्द कारवाई सुरूच आहे. याच कारवाईतून या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नियमित सुरूच राहणार आहे, असे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.