ठाणे – भारतीय लष्कराच्या पाकिस्तान विरुद्धच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूर कारवाईचा गौरव आणि राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ ठाण्यात आज सायंकाळी ५ वाजता ‘तिरंगा पदयात्रा’ काढण्यात येणार आहे.
एक भारतीय म्हणून या तिरंगा पदयात्रेत सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवूया आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवूया असे आवाहन आयोजकांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेत भारतीय लष्कराने आपल्या सामरिक क्षमतेचे दर्शन घडवित भारत देश दहशतवादा विरुध्द किती आक्रमक भूमिका घेऊ शकतो असे जगाला दाखवून दिले. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी लष्करी हवाई तळांवर जाऊन या धाडसी कारवाईत सहभागी झालेल्या जवानांचे कौतुक केले.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ काढण्यात येणार्या तिरंगा यात्रांमुळे सैनिकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तिरंगा यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यात काढली जात आहे. आज, सायंकाळी ५ वाजता तिरंगा पदयात्रा ठाण्यात काढली जाणार आहे. या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.- तिरंगा पदयात्रेचा मार्गकोर्ट नाका येथील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून या तिरंगा पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही पदयात्रा जांभळी नाका मुख्य बाजारपेठ येथून पुढे ठाणे स्थानक परिसरातील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ या पदयात्रेचा समारोप होईल.