ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून हवा प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले असताना शहरात हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे बांधकाम व्यवसायिकांकडून पालन होत नसल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने नियमावलीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३९ बांधकाम व्यवसायिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नियमावलीचे तात्काळ पालन झाले नाही तर, त्यांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तर, १५१ बांधकाम व्यवसायिकांच्या कामात काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुन्हा तीन महिन्यांसाठी टँकर बंदी! प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा सोप्या पर्यायाची निवड

मुंबईतील भायखळा आणि बोरीवली पूर्व येथील हवेचा स्तर वाईट श्रेणीत गेल्यानंतर तेथील बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते. त्यानंतर आता ठाणे महापालिकेनेही ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी, ३१ बांधकाम ठिकाणी सर्व नियमावलीचे पालन केल्याचे आढळले. तर, १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे. ३९ बांधकाम व्यवसायिकांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने नियमावलीची पूर्तता न झाल्यास तत्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच, सर्व २९७ बांधकाम ठिकाणांची अचानक पाहणी करून सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केली.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद

हवा प्रदूषणाचा परिणाम सर्वांना सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व यंत्रणांनी महापालिकेच्या समन्वयाने उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे माळवी यांनी स्पष्ट केले. मेट्रो आणि राज्य रस्ते विकास महामंडळांनी कामे करताना हरित जाळी लावून धूळ नियंत्रण करावे, असेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील विकासकांद्वारे त्यांच्या प्रकल्पात, ५० ठिकाणी हवा प्रदूषण मोजणीचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची सातत्याने पाहणी पर्यावरण विभागामार्फत केली जात आहे. इतर व्यावसायिकांनीही ही यंत्रणा ताबडतोब बसवावी. त्याबाबत हयगय झाल्यास कारवाई करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.

जळाऊ लाकूड वापरण्याबाबत बंदी

ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत त्याबाबतच्या नऊ तक्रारी प्राप्त झाल्या असून घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पाहणी करून २० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच, हॉटेल, तंदूर, रेस्टॉरंट, बेकरी येथे जळाऊ लाकूड वापरण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे.

५ हजार ९०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

ठाणे महापालिकेतर्फे प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय साधून ठाण्याच्या वेशीवर राडारोडा वाहतूक करणाऱ्या व ताडपत्री नसलेल्या एकूण ५ हजार ९०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पीयूसी नसलेल्या चार हजार आठ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या ठिकाणांचा वाहतूक परवाना असल्याशिवाय अशा वाहनांना ठाणे महापालिका हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

हवा प्रदूषण नियंत्रणाबदद्लच्या तक्रारी करण्यासाठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवा प्रदूषण नियंत्रणाबदद्लच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल असे महापालिकेने स्पष्ट केले.