ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अवेळी सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. असे असतानाच, ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर नाक्यावरील रस्त्यावर दुरुस्ती कामासाठी मार्गरोधक लावण्यात आले असून यामुळे मार्ग निमुळता झाल्याने गुरुवारी सकाळी ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला.

ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर मार्ग जातो. हे दोन्ही मार्ग शहरातील अंतर्गत मार्गांना जोडण्यात आलेले आहेत. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभाग तर, पुलाखालील रस्ता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. या मार्गांवर दरवर्षी प्रमाणे यंदाही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. या मार्गांच्या दुरुस्तीचे काम संबंधित यंत्रणांनी हाती घेतले होते. मात्र मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने मार्गांच्या दुरुस्तीचे काम रखडले. त्यातच पावसामुळे रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत.

खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठते आणि त्यामुळे वाहनचालकास ते दिसून येत नाही. यामुळे अपघातांची भीती व्यक्त होत आहे. मुंबई आणि ठाणे शहरांच्या प्रवेशद्वारावरील आनंदनगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे पडले होते. यामुळे याठिकाणी संथगतीने वाहतूक सुरू असल्याने कोंडी होत होती. यावरून टीका होऊ लागतात बुधवारी हे खड्डे बुजविण्यात आले.

खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने त्यांची यंत्रणा लावली होती. तर, खड्डे भरणीसाठी लागणारे साहित्य मात्र एमएमआरडीएने उपलब्ध करून दिले होते. यामुळे या मार्गावरील प्रवास गुरुवारपासून कोंडीमुक्त प्रवास होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु गुरुवारी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागत असल्याने नोकरदार वर्ग हैराण झाला होता. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर नाक्यावरील रस्त्यावर दुरुस्ती कामासाठी मार्गरोधक लावण्यात आले असून यामुळे मार्ग निमुळता झाल्याने गुरुवारी सकाळी ही कोंडी झाल्याचे दिसून आले.