लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : उबाठा आधीच लीन होती, आता ती कधीही विलीन होऊ शकते, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. परंतु २०१९ मध्येच उबाठाचे काँग्रेसीकरण झाले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. प्रादेशिक पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे, असे शरद पवार म्हणतात. म्हणजेच त्यांनी हार मानली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, दत्ता वझे आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. २७ गाव संघर्ष समिती ही न्यायहक्कासाठी संघर्ष करणारी ही समिती आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघामधील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दररोज शिवसेनेत दाखल होत आहेत. खासदार शिंदे यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून अनेकजण पक्षात येत आहे. ताकदीचे कार्यकर्ते पक्षात येत असल्याने आमचा पक्ष मजबूत होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आणखी वाचा-ठाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात, बैठकसत्रापाठोपाठ आता प्रचार मिरवणूकांमध्ये सहभागी

प्रादेशिक पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे, असे शरद पवार म्हणतात. म्हणजेच त्यांनी हार मानली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. उबाठा आधीच लीन होती, आता ती कधीही विलीन होऊ शकते, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. परंतु २०१९ मध्येच उबाठाचे काँग्रेसीकरण झाले आहे, अशी टीका करत त्यांना त्यांचा पराभव दिसू लागल्याचा दावाही त्यांनी केला. घोडा मैदान लांब नाही. चार तारखेला मतमोजणी आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले असून त्यात महायुती आघाडीवर आहे, असा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात केलेले काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेले काम याची पोचपावती देशासह राज्यातील जनता देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महायुतीचा घटक पक्ष आहे. यामुळे महायुतीची सभा शिवाजी पार्कवरच होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. पंतप्रधान मोदी हे जिथे जातात, तिथे माणसांची मोठी गर्दी होते. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी तयार आहेत, असेही ते म्हणाले.