बदलापूरः रायगड जिल्ह्यातील कर्जत, माथेरान आणि आसपासच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी पुन्हा उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ नोंदवली गेली. दुपारी १२ वाजता उल्हास नदीची पाणी पातळी १४ मीटरवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी पातळीत घट जाणवली. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १३.७६ मीटरपर्यंत खाली आल्याने बदलापुरकरांचा जीव भांड्यात पडला.

उल्हास नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ ही बदलापुरकरांसाठी धोक्याची घंटा असते. उल्हास नदीच्या उगमापासून बदलापुरपर्यंत विविध शहरांचे पाणी नदीत मिसळते. नदीच्या उपनद्यांच्या पाणी क्षेत्रात पाऊस वाढल्यास त्याचा परिणाम थेट नदीच्या पाणी पातळीवर होतो. मे महिन्यात रायगड जिल्ह्यातील कळंब, नेरळ, माथेरान, कर्जत या भागात उल्हास नदीच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे २६ जुलै रोजी उल्हास नदीने बदलापुरात इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा संतर्क झाली होती. सुदैवाने पाणी पातळी हळूहळू कमी झाली. त्यामुळे बदलापुरात पाणी शिरण्याचा धोका टळला.

मंगळवारीही रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. सकाळी ५ वाजता उल्हास नदी ११.७१ मीटर उंचीवरून वाहत होती. मात्र त्यानतंर नदी पात्रात सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली. ७ वाजता १२.९६ मीटर, ९ वाजता १३.६६ मीटर तर ११ वाजता उल्हास नदीची पाणी पातळी १४.११ मीटरपर्यंत वाढली होती. १२ वाजता उल्हास नदी १४.१३ मीटरवरून वाहत होती. त्यामुळे उल्हास नदीच्या शेजारी असलेला चौपाटीचा परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हास नदीची इशारा पातळी १६.५ मीटर असून धोका पातळी १७.५ मीटर इतकी आहे. त्यामुळे १४ मीटरवर पाणी गेल्यास प्रशासकीय यंत्रणा सतर्क होतात. गेल्या आठवड्यातही अशाच प्रकारे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. मात्र मंगळवारी दुपारनंतर पाणी पातळीत घट झाली. त्यामुळे बदलापुरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.