बुरशीजन्य रोगामुळे बागा नष्ट होण्याची भीती; बागायतदार हवालदिल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईची ओळख असलेल्या वेलची केळीला बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बागा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली असून वसई पट्टय़ातील बागायतदार हवालदिल झाले आहेत. वसईतील परिसर हा केळीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातून मोठय़ा प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. सध्या वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ  लागल्याने काही ठरवीक ठिकाणीच केळीची लागवड केली जात आहे. त्यामध्ये नाले, उंबरगोठण, सागरशेत, सत्पाला, राजोडी, दोन तलाव, ज्योती अशा विविध भागांमध्ये केळीच्या झाडांची लागवड केली जाते. त्यातही वसईची वेलची केली सुप्रसिद्ध आहे. परंतु यंदा बुरशीजन्य रोगामुळे वसईतील वेलची केळीच्या बागा नष्ट होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वसईतील केळी मुंबई परिसरातील विविध बाजारांमध्ये पाठवली जातात. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिकरीत्या ती वाढवली जातात. त्यामुळे त्यांना मागणी जास्त असते. मात्र यंदा बुरशीजन्य रोगामुळे वेलची केळीचे उत्पादन फारच कमी होणार आहे, असे बागायतदारांनी सांगितले. बुरशीचे नमुने तपासणीसाठी कृषी विज्ञान केंद्रात पाठवण्यात आले आहेत. कृषी पर्यवेक्षकांकडून तपासणी झाल्यानंतरच या रोगाबाबत माहिती मिळेल आणि त्यानंतर उपाययोजना करण्यात येणार आहे.

वसईतील कृषी विभागाने या रोगाची पाहणी केली आहे. केळीच्या कंदाचे नमुने त्यांनी तपासणीसाठी कृषीविज्ञान केंद्रात पाठवले आहेत. या झाडावर कॅप एक्स ५० एस पी, कारटॅप हायड्रोक्लोराइड यांची ५० टक्के फवारणी करण्यास सांगितले आहे, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. वसई पट्टय़ात विविध प्रजातींच्या केळीची लागवड केली जाते. त्यात वेलची केळी, बिनबोंड, लोखंडी बंगाली, बनकेळ, भूरकेळ, राजेळी यांचा समावेश आहे.

वसई पट्टय़ातील काही शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केळीच्या उत्पादनावरच अवलंबून असतो. मात्र यंदा वेलची केळीवर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे ही केळी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाला याची माहिती देण्यात आली आहे.    – फरमीन परेरा, शेतकरी

वातावरणात झालेल्या बदलामुळे या बुरशीजन्य रोगाची लागण वेलची केळीच्या झाडावर झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे पथक आले आहे. त्यांच्यामार्फत केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित बोलावून उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. औषध फवारणी केल्यानंतर हा रोग नियंत्रणात येईल.    – साईनाथ पाटील, कृषी पर्यवेक्षक अधिकारी, वसई

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Velchi banana
First published on: 22-01-2019 at 02:10 IST