ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केले आहे. यामुळे ठाणेकरांना २४ तासांऐवजी १२ तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.
हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचे मानले जातात. यापैकी स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २ मे, २०२५ रोजी सकाळी ९ ते शनिवार ३ मे २०२५ रोजी सकाळी ९ यावेळेत बंद राहणार आहे. या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केले आहे. यामुळे ठाणेकरांना २४ तासांऐवजी १२ तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे.
या नियोजनानुसार, शुक्रवार, २ मे, २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार, २ मे, २०२५ रोजी रात्री ९ ते शनिवार, ३ मे, २०२५ रोजी सकाळी ९ यावेळेत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणी पुरवठा बंद राहील.
बंदनंतर कमी दाबाने पाणी
पाणी बंदच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची कामे, चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.