कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात, नवीन एस. टी. बस आगारात भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषकरून महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या प्रवाशांना लक्ष्य करून चोरटे चोऱ्या करत आहेत. सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान दोन महिलांनी पुण्याहून आलेल्या एका महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्या पिशवीतील ४६ हजार रुपये काढून घेऊन पोबारा केला.
या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महात्मा फुले पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मोशी येथील नकातेनगर थेरगाव भागात राहणाऱ्या मंदा गुणवंत साबळे या कल्याणमध्ये आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या. त्या सोमवारी पु्न्हा आपल्या पुण्याजवळील घरी निघाल्या होत्या. त्यांनी स्वतः जवळील बटव्यात पैसे, सोन्याचे दागिने असा एकूण ४६ हजार ५०० रूपये ठेवले होते. हा बटवा त्यांनी पिशवीत ठेवला होता. त्यांना वाटेत अडवून दोन महिलांनी बोलण्यात गुंतवून, त्यांची नजर चुकवून त्यांच्या पिशवीतील बटवा काढून घेतला.
तक्रारदार महिला मंदा साबळे या कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्यांनी आपल्या काखोटीला असलेल्या पिशवीकडे पाहिले तर त्यांना पिशवीची साखळी उघडी असल्याचे दिसले. त्यांनी पिशवीत पाहिले तर त्यांना रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असलेली पिशवी गायब असल्याचे दिसले.
मंदा साबळे यांनी तात्काळ माघारी फिरून कल्याण रेल्वे स्थानक भागात भेटलेल्या दोन्ही महिलांचा शोध घेतला. त्या आढळून आल्या नाहीत. घरातून निघाल्यानंतर सुरक्षित असेलला पिशवील ऐवज अचानक गायब झाल्याने मंदा साबळे अस्वस्थ झाल्या. त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली आहे.गेल्या दोन महिन्याच्या काळात कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, नवीन एस. टी. बस आगार भागातून प्रवाशांना लुटून भुरट्या चोरांनी लाखो रूपयांचा ऐवज चोरीला नेला आहे.
यापूर्वी कल्याण रेल्वे स्थानक भागात गद्रुल्ले, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे अड्डे असायचे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आल्यानंतर हे अड्डे उध्दवस्त करण्यात आले. रेल्वे स्थानक भागात पोलिसांची गस्त असुनही चोऱ्या होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.