डोंबिवली : तुमच्या घरात वापरून जुने झालेले कपडे आहेत का. ते आम्हाला गरीब गरजू लोकांना द्यायचे आहेत, असे म्हणत एका चाळीस वर्षाच्या महिलेने डोंबिवली पूर्वेत नांदिवली भागात राहत असलेल्या एका महिलेच्या दारात उभे राहून कपडे देण्यासाठी तगादा लावला. घरात जुने कपडे नाहीत, असे सांगुनही महिला हटत नव्हती. दरम्यानच्या काळात महिलेने घरातील महिलेला भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील तीन लाख ६० हजार रूपयांचे दागिने लुटून नेले.

या गुन्ह्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार सायली अमरजीत सावंत या डोंबिवली पूर्वेतील नांदिवली गाव भागातील गावदेवी मंदिर परिसरात कुटुंबीयांसह राहतात. सायली सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेप्रमाणे अज्ञात ४० वर्षाच्या अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मागील काही वर्षापासून डोंबिवलीत अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते स्वताजवळ संस्थेचे ओळखपत्र ठेऊन घरोघरी जाऊन आदिवासी, दुर्गम भागात जाऊन गरजूंना कपडे वाटप करायचे आहेत असे सांगून नागरिकांकडून कपडे जमा करून घेऊन जातात. चांगल्या ठिकाणी आपल्या घरातील कपडे जातात म्हणून नागरिक घरातील महिला घरातील सुस्थितीत असलेले पण वापरून जुने झालेले कपडे या कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करतात. आता काही भुरट्या महिला जवळ कोणत्याही संस्थेचे ओळखपत्र नाही. स्वताची ओळख लपवून घरोघरी फिरून जुने कपडे मागण्याचा प्रयत्न करतात. या कालावधीत घरात कोण आहे याची चाचपणी करतात. चोरी किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांचीही टेहळणी सुरू असते. असा फसवणुकीचा अनुभव असलेल्या काही नागरिकांनी सांगितले.

सायली सावंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की बुधवारी दुपारच्या वेळेत कार्यालयातून मी घरी आले होते. दरम्यानच्या काळात घरात असताना अचानक एक महिला घराच्या दरवाजात आली. तिने आपण गरजू गरीबांसाठी जुने कपडे घेतो असे सावंत यांना सांगितले. पण घरात जुने कपडे नाहीत. जेव्हा कधी असतील तेव्हा नक्की देईन, असे सायली सावंत यांनी दारात आलेल्या महिलेला सांगितले. महिला काहीतरी करून घरातील जुने कपडे द्याच, असा आग्रह करून दरवाजा समोरून जाण्यास तयार नव्हती. घरात जुने कपडे नाहीत सायली सावंत दारातील महिलेला सांगत होत्या. दरम्यानच्या काळात दारात जुने कपडे घेण्यासाठी आलेल्या महिलेने सायली सावंत यांना भुरळ घालून त्यांना संमोहित केले आणि बोलत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा एकूण तीन लाख ६० हजार रूपयांचा ऐवज काढून पलायन केले.

थोड्या वेळाने भानावर आल्यावर सायली यांना आपल्या जवळील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे आढळले. घरात आले तेव्हा सर्व दागिने अंगावर असताना अचानक दागिने गायब झाले कसे, असा प्रश्न त्यांना पडला. दारात जुने कपडे घेण्यासाठी आलेल्या महिलेने आपणास भुरळ घालून आपल्या जवळील सोन्याचे दागिने फसवणूक करून नेल्याचा संशय व्यक्त करून सायली सावंत यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे याप्रकरणाचा तपास करत आहेत.