लग्न म्हटल्यावर अनेक गोष्टी त्यात आल्या. म्हणजे अगदी लग्नाच्या तयारी पासून ते नववधूचं घरी स्वागत करण्यापर्यंत सारं काही तुम्ही सुद्धा अगदी हौसे एखाद्या लग्नात केलं असणार किंवा या साऱ्या सोहळ्याचा कधी ना कधी भाग राहिला असाल. मात्र या साऱ्या सोहळ्यामध्ये सर्वात उत्सुकतेचा विषय असतो ते नाव घेणं. मराठी लग्नांमध्ये तर नाव घेण्यासाठी आग्रह करणारे अनेक नातेवाईक आवर्जून दिसून येतात. काही नवदांपत्य असली भन्नाट नावं घेतात की त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसतात. असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डोंबिवलीमधील एका तरुणाचा असल्याचं सांगितलं जातंय.
काय आहे व्हिडीओमध्ये…
सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा हा व्हिडीओ डोंबिवलीच्या प्रितम पाटील या तरुणाचा असल्याचा दावा केला जातोय. घरामध्ये प्रवेश करण्यापुर्वी त्याला नाव घेण्यास सांगितलं. यावेळी त्याने अगदी फिल्मी स्टाइल नावं घेतलं पण त्यामध्येही नवी मुंबईत सध्या चर्चेचा विषय असणाऱ्या एका विषयावर त्याने भाष्य केलं. प्रितमने नाव घेताना नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणाच्या वादावर भाष्य करत या विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव दिलं जाईल असं म्हटलं आहे. पुढे बोलताना त्याने अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामधील झुकेंगा नही साला हा डायलॉग पुढे जोडत त्याच खास स्टाइलमध्ये अनुवटी खालून हात फिरवला. त्याने घेतलेलं हे फिल्मी नाव ऐकून सारेच जण हसू लागले.
“दिबांचंच नाव लागणार नवी मुंबई विमानतळाला, रुचाचं नाव घेतो झुकेगा नहीं साला…”, असं नाव प्रितमने घेतल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून आनंद व्यक्त केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दि.बा. पाटील कोण?
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अध्वर्यू अशी दि. बा. पाटील यांची ओळख सांगितली जाते. माजी खासदार, आमदार व पनवेल नगराध्यक्ष दिनकर बाळू पाटील हे रायगड जिल्ह्यासहीत संपूर्ण महाराष्ट्राला दि.बा. पाटील नावाने परिचित आहेत. दि. बा. हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते.
शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले…
दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.