बलजीत कौर हिने रविवारी पहाटे ८,५१६ मीटर उंचीचे माउंट ल्होत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शिखर सर केले. हिमाचल प्रदेशातील २७ वर्षीय बलजीत कौर, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ८,००० मीटर उंचीचे चार शिखरे सर करणारी एकमेव भारतीय गिर्यारोहक ठरली आहे. ८,८४८.८६ मीटर उंच असलेले जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या एका दिवसातच बलजीतने माऊंट ल्होत्से सर केले.

ही बातमी कळताच बलजीतची आई शांती देवी भावूक झाल्या. हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील कंधाघाट तहसीलमधील पंजरोल गावातून द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शांती देवी म्हणाल्या, “आमच्या मुलीने केलेला पराक्रम आमच्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “तिला नेहमीच पर्वतांचे आकर्षण होते. लहानपणी ती आमच्या गावाजवळच्या छोट्या टेकड्यांवर चढायची,”

८००० मीटर पेक्षा उंच असणारे पाच पर्वत सर करणारी प्रियंका मोहिते आहे तरी कोण? जाणून घ्या तिचा प्रवास

लहान असताना, बलजीत, तिच्या तीन भावंडांसह, शांतीदेवीला शेतीच्या कामात मदत करायची. तिचे वडील अमर सिंग हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करत असताना, बलजीत शेजारच्या गावातील मामलीघ येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्याव्यतिरिक्त तिच्या आईला मदत करत असे.

(Photo : Instagram/@b_kaur__bharti)

शाळेतच तिने नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) मध्ये आपले नाव नोंदवले. एनसीसी कॅम्प दरम्यान, बलजीतचा पहिला प्रयत्न गिर्यारोहणाचा होता. वयाच्या २०व्या वर्षी, तिची माउंट देव तिब्बा येथे एनसीसी मोहिमेसाठी निवड झाली आणि त्यानंतर दहा एनसीसी गिर्यारोहकांच्या टीमने ७,१२० मीटर उंचीच्या माउंट त्रिशूलला या मोहिमेसाठी निवडले. मात्र २०१५ साली खराब वातावरणामुळे त्यांना या शिखरावरील चढाई थांबवावी लागली. यावेळी त्यांनी ६,३५० मीटर पर्यंतची उंची गाठली होती.

Photos : प्रियंका मोहितेने रचला इतिहास; ठरली ८००० मीटरपेक्षा उंच पाच पर्वत सर करणारी भारतातील पहिली महिला

गेल्या एका वर्षात बलजीत नेपाळ-तिबेट सीमेजवळील ७,१६१ मीटर उंचीचे पुमोरी शिखर सर करत, राजस्थानच्या गुणबाला शर्मासह पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहकांपैकी एक ठरली. नंतर ती ८,१६७ मीटर उंच माउंट धौलागिरी यशस्वीपणे चढणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली.

(Photo : Instagram/@b_kaur__bharti)

२३ मे रोजी माउंट ल्होत्से, २२ मे रोजी माउंट एव्हरेस्ट, १२ मे रोजी ८,५८६ उंचीचा माउंट कांचनजंगा आणि २८ एप्रिलला ८,०९१ मीटर उंचीचा माउंट अन्नपूर्णा ही ८००० मीटरची चार शिखरे सर करणारी ती एकमेव भारतीय महिला गिर्यारोहक ठरली. तिने पुण्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिच्या ८,००० मीटर उंचीच्या पाच चढाईच्या विक्रमाशी बरोबरी केली.