लग्नसोहळा म्हटलं की, धांगडधिंगा आलाच; पण कधी-कधी लग्नसमारंभात क्षुल्लक कारणांवरूनही वाद होतात. ते इतके टोकाला जातात की, एखाद्याच्या जीवावरही बेतले जातात. बिहारमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. इथे दोन तरुणांना खुर्च्या चोरल्याच्या संशयावरून झाडाला उलटं टांगून बेदम मारहाण करण्यात आली आहे.
बिहारमधल्या सोनबारसा गावात हा प्रकार घडलाय. इथल्या महंगू बिंद यांच्या घरात लग्न होतं. मुलीचं लग्न लावून वऱ्हाडी मंडळी घरी परतली, तेव्हा घरातल्या पाच खुर्च्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा गावातच राहणाऱ्या राजकुमार आणि बिरबल बिंद या दोघांवर गावकऱ्यांनी चोरीचा आळ घेतला. इतकंच नाही या दोघांना गावकऱ्यांनी झाडाला उलट लटकवून बेदम चोप दिला. तीन तास गावातले पैलवान या दोघांनाही बेदम मारहाण करत होते. आख्खा गाव हा तमाशा बघत होता, पण एक व्यक्तीही त्या दोघांच्या मदतीला धावून आली नाही. शेवटी या दोघांच्या कुटुंबीयांनी कसेबसे तीन हजार रुपये जमवून या दोघांची सुटका करून घेतली. या प्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांनी मात्र पोलिसांत गुन्हा नोंदवायला नकार दिला आहे.