Viral Post Shows Mumbai Man Was Hit By Cab : मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी… दररोज लाखो लोक इथे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत, दिवसरात्र मेहनत करत असतात. ट्रेनमध्ये बसायला चौथी सीट दिली नाही तरी तुम्हाला चक्कर आली तर हक्काने आपल्या माणसासारखी तुमची काळजीही घेतात. हेच खरे मुंबईकर असतात. तर असाच काहीसा अनुभव मुंबईच्या एका प्रवाशाला आला; जो त्याने इतरांबरोबर शेअर केला आहे.
रेडिट @Pea_paw098 युजरचा तीन दिवसांपूर्वी बाईक अपघात झाला होता. घाटकोपरजवळ एका पांढऱ्या कॅबने त्याला धडक दिली. कॅब थांबली नाही आणि तो डिव्हायडरवर जाऊन आपटला आणि काही सेकंदांसाठी त्याच्या डोळ्यांपुढे अंधार पडला. पण घाबरण्याआधीच, मित्र किंवा कुटुंबाकडून नाही तर अनोळखी माणसं त्याच्या मदतीसाठी धावून आली. पण त्यानंतर जे घडलं, त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही.
एका महिलेनं त्याचं डोकं धरलं. एका कॉलेजच्या विद्यार्थिनीनं त्याचा फोन वापरून रुग्णवाहिका बोलवली. तसेच दुसरा माणूस त्याला सांगत राहिला, ‘भाऊ, डोळे बंद करू नकोस’ (भाई, आँख मत बंद कर) त्यांनी त्याच पाकीट घेतलं नाही की, कोणीही त्याचा फोनही चोरला नाही. ते फक्त त्याच्याजवळ बसून होते. त्याला त्यांची नावं कधीच कळली नाहीत; पण त्यांची उपस्थिती त्याच्यासाठी लाखमोलाची होती.
भाऊ, डोळे बंद करू नकोस (Viral Post)
तर नेहमीप्रमाणे अंधेरीहून चर्चगेटला जाणारी रात्रीची ९ वाजून ३३ मिनिटांच्या जलद ट्रेनमध्ये तो चढला. त्यानंतर चर्नी रोड व मरीन लाईन्स याच्यामध्ये कुठे तरी, एका वृद्ध काकांनी माझ्याकडे पाहिले आणि विचारले, ‘तू ठीक आहेस, का बेटा?’ मी होकार दिला. आतून मी थोडासा तुटलो होतो; पण वेदनेमुळे नाही, तर फक्त… कृतज्ञतेमुळे. मुंबई शहर तुम्हाला पूर्णपणे तोडून टाकेल; पण कधी कधी ते तुम्हाला एकत्र ठेवते, तेही अनोळखी लोकांच्या हातून, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
व्हायरल पोस्टला ‘मी जवळजवळ मेलोच होतो’, अशी कॅप्शन दिली आहे. पोस्ट पाहून अनेक युजर्सनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. “ठाणे-सीएसटी गर्दीच्या ट्रेनमध्ये बेशुद्ध पडलेल्या त्यांच्या मित्राला लोकांनी कशी मदत केली हे आठवले. कोणीतरी पंखा लावला, दुसऱ्याने त्याचा टाय सैल केला आणि गाडीतील एक डॉक्टर आला. मुंबईची स्वतःची एक जादू आहे”, “पनवेल-गोरेगाव लोकलमध्ये बेशुद्ध पडल्याचा वैयक्तिक अनुभव एका युजरने शेअर केला. समोरच्या माणसाने मला पकडले, त्याची जागा देऊ केली. दुसऱ्या कोणीतरी मला ओआरएस दिला”, “मुंबई क्रूर असू शकते; पण असे क्षण हे शहर खास बनवण्याची आठवण करून देतात” आदी अनेक कमेंट्स केल्या गेल्या आहेत.