दोन्ही बाजूला खड्डे असल्याने रोजच वाहतूक कोंडी वसई: मागील महिनाभरापूर्वी वसई पूर्वेतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा येथे नवीन उड्डाण पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या पुलावर व पुलाच्या खालील रस्त्यावर खड्डे पडल्याने या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वसई पूर्वेतील भागात महामार्गावरील मालजीपाडा येथे नवीन उड्डाणपूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र या उड्डाणपुलाच्या कामामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याच अनुषंगाने या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र उड्डाणपुलावर पुलाच्या खालील बाजूचे काम योग्यरीत्या न करण्यात आल्याने येथील अडचणी कायम राहिल्या आहेत. पुलावरील रस्ता आणि पुलाखालील रस्ता खड्डेमय बनला आहे. महामार्गावर होणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे मालजीपाडा पूल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार या पुलाचे काम हे घाईघाईने पूर्ण करून खुला करण्यात आला आहे. पुलावरील व पुलाचे बाजूचे काम ही योग्यरीत्या पूर्ण केले नसल्याचे चित्र दिसून आला आहे. पुलावरील संरक्षक कठडय़ाचे काम पूर्ण पणे बांधले नसून गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावरील कठडय़ाचे काँक्रीटीकरण करण्यात न आल्याने लोखंडी सळयांची जाळी लावण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास जर ही जाळी दिसून न आल्यास त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुलाच्या खालील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अशात या भागातील स्थानिक नागरिक व इतर वाहनचालक यांनाही या भागातून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. मालजीपाडा उड्डाण पुलाचे काम हे पूर्ण झाले आहे. सध्या या रस्त्यावर डांबरीकरणाचा पट्टा मारायचा आहे. तो पावसाळ्यानंतर मारण्यात येईल. तसेच, सध्या काही ठिकाणी जे खड्डे पडले आहेत तेही तातडीने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. - अमित साठे, साहाय्यक कार्यकारी अभियंता, आयआरबी.