भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात राजकीय पक्षांच्या अनधिकृत कंटेनर कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासन राजकीय पुढाऱ्यांपुढे हतबल झाल्याचे आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहेत.
शिवसेनेच्या कंटेनर शाखांना विरोध म्हणून, भाजपनेही कंटेनर कार्यालये उभारण्याचा संकल्प केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सोमवारी शहराचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेरच एका कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यामुळे शहरात राजकीय पक्षांच्या वाढत्या अनधिकृत कार्यालयांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
वर्षभरापूर्वी प्रशासनाने शहरातील अनधिकृत राजकीय कार्यालयांची यादी तयार केली होती. त्यामध्ये जवळपास ५२ कार्यालये अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर केवळ दोन ते तीन कार्यालयांवरच कारवाई करण्यात आली, आणि ही मोहीम नंतर थंडावली.
दरम्यान, महिनाभरापूर्वी शिवसेना पक्षाने पुन्हा शहरातील विविध ठिकाणी कंटेनर शाखा उभारल्या. यावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, भाजपनेही अशाच प्रकारचे कंटेनर कार्यालये उभारण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे.
शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या दबावामुळेच प्रशासन कारवाई टाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.