सुहास बिऱ्हाडे

वसई- मुंबई-अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरार येथील स्थानकाच्या परिसरात नागरी वसाहती (टाऊनशिप) आणि व्यवसाय केंद्र (बिझनेस हब) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने चार जणांची समिती स्थापन केली असून ही समिती या विकास योजनेची आखणी आणि देखरेख करणार आहे.

मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन)चे काम जोरात सुरू आहे. ही बुलेट ट्रेन वसई तालुक्यातील २१ आणि वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील १४ गावांतून जाणार आहे. वसईतून तो एकूण २६.५ किलोमीटर लांबीचा आहे. विरारमधील बुलेट स्थानक हे नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील वालईपाडा येथे तयार केले जाणार आहे. या बुलेट ट्रेनसाठी राज्यातून एकूण ४ स्थानके आहे. त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर यांचा समावेश आहे. स्थानक उभारण्याचे कंत्राट एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले आहे. या स्थानक परिसरात गजबज राहावी यासाठी रेल्वे स्थानक परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने विशेष समिती स्थापन केली आहे. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) कंपनीबरोबर समनव्य ठेवून ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये राज्याचे नगर रचना संचालक अविनाश पाटील, एमएमआरडीएचे मुख्य शहर नियोजनकार शंकर देशपांडे, ठाणे महापालिकेचे नगररचना संचालक शैलेंद्र बेंडळे आणि वसई विरार महापलिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस.रेड्डी यांचा समावेश आहे.

बुलेट स्थानकाचा विकास करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. त्यांची पहिली बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे संपन्न झाली होती. शुक्रवारी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी (जायका) कंपनीचे संचालक वाकाबायसी यांनी शुक्रवारी वसई पालिकेचे नगररचना विभागाचे संचालक वाय एस रेड्डी यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. याशिवाय परिसराचा विकास करण्यासाठी महापालिकेतर्फे टाऊनशीप तयार केली जाणार आहे, या ठिकाणी पर्यटन आणि उद्याोगाला चालना देण्यासाठी बिझनेस हब विकसित केले जाणार आहे. अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

हेही वाचा >>>वसई विरार महापालिकेतील २७ आयुर्वेदीक डॉक्टर झाले कायम

स्थानकात जाण्यासाठी दोन रस्ते

नालासोपारा येथील वालईपाडा येथे बुलेट स्थानक बनवले जाणार आहे. या बुलेट स्थानकात लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी दोन नवीन मार्ग पालिकेने प्रस्तावित केले आहेत. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेकडून हे रस्ते विकसित केले जाणार आहेत, त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यातील एक रस्ता नालासोपारा येथून तर दुसरा रस्त्ता विरार येथून तयार केला जाणार आहे. यामुळे नालासोपारा येथून ३.४ किलोमीटर तर विरार पासून ५.२ किलोमीटर एवड्या अंतरात बुलेट स्थानक गाठता येणार आहे. २० ते २५ मिनिटात बुलेट स्थानकापर्यंत पोहोचता येणार आहे.

अशी बुलेट ट्रेन…

या बुलेट ट्रेनचा मार्ग पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतून जाणार आहे. वसई विरारमधील २१ गावांचा समावेश आहेत. त्यात विरार, कोपरी, चंदनसार, नालासोपारा येथील बिलालपाडा, मोरे, पोमण, मोरी, बापाणे, ससूनवघर, नागले, सारजा मोरी, नारिंगी, जुली बेट अशी एकूण २१ गावे आहेत. मुंबई बडोदा या दोन शहरांमध्ये एकूण १७ स्थानके आहेत. महाराष्ट्रातून एकूण ४ थांबे आहेत. त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या स्थानकांचा समावेश आहे. या प्रवासासाठी दिड तास वेळ लागणार आहे. या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील ७०.५ हेक्टर जमीन संपादित कऱण्यात आली आहे. भूसंपादनाची १०० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात ५२.७ हेक्टर खासगी क्षेत्र, ७.४ हेक्टर वनक्षेत्र आणि ४.३ शासकीय जमिनीचा समावेश आहे. भूसंपादनाची प्रक्रिया वसईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(बुलेट ट्रेन स्थानकाचा विकास करण्यासाठी जपानच्या जायका कंपनीच्या शिष्टमंडळाने विरारमध्ये पाहणी केली.)