वसई: विरार पश्चिमेच्या अर्नाळा आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवासाठी खिळखिळ्या व जुन्या झालेल्या बसेस सोडल्या जातात. त्याचा प्रवाशांना फटका बसतो. आता या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी  पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. रविवारी या बसचे वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते लोकार्पण करून सेवेसाठी सुरू केल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा एसटी महामंडळाचे आगार आहे. या आगारातून वसई विरार, ठाणे, यासह भुसावळ, औरंगाबाद, पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डी, विटा, सोलापूर, चोपडा, तुळजापूर यासह अन्य लांब पल्ल्याच्या ठिकाणी सेवा पुरविली जाते.  दिवसाला या आगारातून ३१० इतक्या एसटी बस सेवेच्या फेऱ्या होत आहेत. मात्र यातील काही एसटी बस गाड्या या फारच जुन्या झाल्या होत्या.

काही बस तर अक्षरशः खीळखिळ्या झाल्या होत्या त्यामुळे  यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा त्रास सहन करावा लागत होता. तर काही चालकांना सुद्धा तांत्रिक अडचण निर्माण होऊन त्याचा फटका बसत होता.यासाठी नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार ३० एसटी बसेस अर्नाळा आगारासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील सद्यस्थितीत अर्नाळा आगारात ५ नवीन एसटी बस उपलब्ध झाल्या असून रविवारी त्या एसटीचा लोकार्पण सोहळा वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या हस्ते पार पडला. यावेळी एसटी महामंडळाचे अर्नाळा आगार व्यवस्थापक सिद्धेश सूर्यवंशी, रामदास मेहेर यासह अर्नाळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.या ५ नवीन एसटी गाड्या ४० प्रवासी आसन व्यवस्था असलेल्या आहेत. सुरवातीला या एसटी बस ची संख्या ६७ होती आता ७२ इतकी झाली आहे.

आता पंढरीची वारी सुद्धा येत असून या आगारातून वारीसाठी मोठ्या संख्येने नागरिक जातात त्यामुळे पंढरपूर, विटा, चोपडा या मार्गावर प्राधान्याने या बस गाड्या सोडल्या जातील असे आगार व्यवस्थापक सिद्धेश सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

अर्नाळा आगाराला कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बस गाड्या मिळाल्या आहेत. एकूण ३० गाड्या मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात पाच दिल्या आहेत उर्वरित बस गाड्या लवकर उपलब्ध होतील यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. शहरांतर्गत व लांब पल्ल्याचा प्रवासासाठी चांगली परिवहन सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. :- स्नेहा दुबे- पंडित, आमदार वसई.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१ कालबाह्य बसेस बाहेर निघणार

आगारात ही बारा व पंधरा वर्षे उलटून गेलेल्या कालबाह्य बसेस आहेत.अशा बसेस मधून काही वेळा प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे खीळ खिळ्या व भंगार अवस्थेत असलेल्या बस मधून प्रवास करतानाही अनेक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा या जुन्या झालेल्या बसेसचा ब्रेक लागत नाही तर  घाटात वळण घेताना  बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तर काही वेळा या बसेस मध्ये तांत्रिक अडचण निर्माण होऊन बस बंद पडतात. अशा वेळी प्रवाशांचा सुद्धा खोळंबा होतो. याशिवाय चालक व वाहक यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. अशा जुन्या व कालबाह्य ठरलेल्या बसेस आता काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अर्नाळा आगारातून येत्या तीन महिन्यात २१ कालबाह्य बसेस बाहेर काढल्या जाणार आहेत.