भाईंदर :- मिरा रोड येथील महापालिकेच्या चारचाकी वाहनतळाच्या इमारतीत भंगार रिक्षा उभ्या केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध न राहता, प्रशासनाचे धोरण अपयशी ठरले असल्याचे आरोप केले जात आहे.

मिरा भाईंदर शहरात चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करण्यास वाहतूक पोलिसांकडून नकार मिळत असल्याने वाहनतळांची आवश्यकता अधिक जाणवते. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने मिरा रोड येथील कनकिया भागात (आरक्षण क्रमांक २६४) चारचाकी वाहनतळाची इमारत उभारली आहे. या इमारतीत सुमारे ६६ चारचाकी वाहने उभी करता येतात.

या वाहनतळाच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी महापालिकेने एका खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी चारचाकी वाहनांच्या ऐवजी भंगार रिक्षा उभ्या केल्या जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही, अशी तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे.

या रिक्षा एका खासगी बँकेच्या असून, त्यांच्यासोबत स्वतंत्र करार करण्यात आला असल्याची माहिती संबंधित कंत्राटदाराच्या प्रमुखांनी लोकसत्ताला दिली. यामुळे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचा वापर कंत्राटदाराने परस्पर भाडेकरार करून लाखोंचे उत्पन्न मिळवण्यासाठी केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी केली असल्याची माहिती मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया सुरू

मिरारोड येथील आरक्षण क्रमांक २६४ वरील वाहनतळ चालवण्यासाठी महापालिकेने ‘मे. आशुतोष इंटरप्रायझेस’ या कंत्राटदाराची निवड केली होती. यासंदर्भात २५ मे २०२२ रोजी तीन वर्षांचा करार करण्यात आला होता. या करारातून महापालिकेला एकूण ६९ लाखांचे उत्पन्न मिळाले. सदर करार नुकताच पूर्ण झाल्याने आता नव्या कंत्राटदाराची निवड करण्यासाठी प्रशासनाने ६९ लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न गृहित धरून खुल्या निविदा प्रक्रियेस मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेस सुरुवात झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.