वसई:  मागील दोन दिवसांपूर्वी समुद्राला आलेली भरती व वादळी वारे यामुळे वसईच्या भुईगाव व सुरुची समुद्र किनारी शेकडो झाडांची पडझड झाली आहे. सातत्याने बसणाऱ्या लाटांच्या तडाख्यामुळे सुरुच्या बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

वसई पश्चिमेच्या भागात भुईगाव व सुरुची बाग समुद्र किनारा आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने भरलेला असल्याने या भागात मोठ्या संख्येने पर्यटक येतात तर दुसरीकडे विविध प्रजातीचे पक्षी आश्रयाला येत आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात सुरुच्या बागा ही आहेत. या सुरुच्या झाडांमुळे समुद्र किनाऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडत आहे.

मात्र मागील काही वर्षांपासून बेसुमार वाळू उपसा व समुद्राच्या लाटांचा तडाखा यामुळे समुद्र किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप होऊ लागली आहे. याचा फटका सुरुच्या बागांना बसू लागला आहे. मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी समुद्राला मोठी भरती आली होती.त्यामुळे मोठं मोठ्या लाटा ही समुद्र किनाऱ्यावर उसळत होत्या. या लाटांचा तडाखा समुद्रकिनाऱ्यावरील सुरुच्या झाडांना बसला. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो सुरुची झाडे उन्मळून पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरवर्षी वादळी वारे व लाटांच्या तडाख्याने हजारो सुरुची झाडे कोसळतात मात्र त्याला संरक्षण देण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर सुरुच्या बागा नामशेष होतील अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धूपप्रतिबंधक बंधारा तयार करण्याकडे दुर्लक्ष

दरवर्षी हजारोंच्या संख्येने सुरुची झाडे कोसळून पडत असल्याने किनार पट्टीच्या भागातील सुरुच्या बागाच नष्ट होण्याची शक्यता आहे. धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे. भुईगाव समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारे उभारावे यासाठी यापूर्वी १.८० कोटी तर आता आपत्ती व्यवस्थापन नियोजनातून ४.५० कोटी निधीची मंजूर झाला आहे. मात्र बंधाराच तयार न झाल्याने किनाऱ्याची धूप सुरूच असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले आहे.