भाईंदर : मिरा भाईंदर शहरात भाजप तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने एक मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील काही दिवसांत माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपसमोर कठीण आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील राजकीय पक्ष संघटना आपल्या बळकटीवर भर देत आहेत. राज्यात महायुतीचा भाग असलेल्या शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांचे स्थानिक स्तरावरील संबंध विशेष चांगले नसल्याचे दिसते. हे दोन्ही पक्ष अनेकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. परिणामी, दोन्ही पक्षांनी संघटनात्मक वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.
यात शिवसेना पक्ष भाजपमधील नाराज कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात सामावून संघटना बळकट करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शिल्लक राहिलेल्या नगरसेवकांपैकी बरेच जण हळूहळू शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असून, आगामी निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
भाजपला शिवसेनेचे आव्हान का?
मिरा भाईंदर हे शहर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथील महापालिकेत पक्षाची एकहाती सत्ता असते. सध्या पक्षाचे नेतृत्व आमदार नरेंद्र मेहता करत आहेत. मात्र, २०१९ साली विधानसभा निवडणुकीत मेहता यांचा पराभव झाल्यामुळे पक्षसंघटनेला धक्का बसल्याचे दिसून आले. अपक्ष आमदार गीता जैन आणि माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी मेहता यांना आव्हान दिल्यामुळे पक्षातच तीन गट निर्माण झाले.मेहता यांनी या संघर्षावर मात करून २०२४ ची निवडणूक पुन्हा जिंकली आणि संघटनेवर वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, जैन आणि व्यास यांचे समर्थक यामुळे नाराज झाले असून, ते आपल्या राजकीय भवितव्याच्या शोधात आहेत. याचदरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांना राज्य सरकारमध्ये मंत्रीपद बहाल करण्यात आले. हे मिरा भाईंदर शहरासाठी पहिले मंत्रीपद असल्यामुळे सरनाईकांची मोठी प्रतिमा तयार झाली आहे.शिवाय, सरनाईक यांनी मागील पंधरा वर्षांत हळूहळू शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढवली असून, त्यामुळे पक्षसंघटनेला वेगळीच ताकद प्राप्त झाली आहे. त्यामुळे भाजपच्या विचारसरणीशी संलग्न असलेले तसेच मेहता यांच्याशी नाराज असलेले अनेक पदाधिकारी आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
भाजपमध्येही प्रवेशाचे सत्र सुरूच
मिरा भाईंदर शहरात भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी भाजप मध्ये सातत्याने प्रवेश करत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ७० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उदिष्ट पक्षाने ठरवल्यामुळे संघटना वाढीवर अधिक भर देण्यात आला आहे.
“परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामाचा धडाका पाहून अनेक शहरातील तरुण व विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना प्रवेश करत आहेत. आम्ही सध्या केवळ कार्यकर्त्यांचाच प्रवेश घेत असून पदाधिकाऱ्यांचा प्रवेश स्थगित ठेवला आहे.” राजु भोईर – जिल्हाध्यक्ष ( शिवसेना )