वसई: मुंबई, ठाण्याच्या पाठोपाठ आता वसईतही करोनाचा शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर वसई – विरार महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून विलगीकरण कक्ष तयार केला आहे. याशिवाय संशयित रुग्णांची तपासणी करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत चार हजार जणांची करोना चाचणी ही करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे भागात करोना रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात ही करोनामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबई- ठाण्या प्रमाणेच वसई विरार भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकताच वसई पूर्वेच्या भागात एक करोना बाधित रुग्ण आढळून आला होता. उपचारानंतर हा रुग्ण जरी बरा असला तरी एकप्रकारे वसईतही करोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या करोना आजाराशी लढण्यासाठी वसई विरार महापालिकेचा आरोग्य विभाग ही सतर्क झाला आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेले विलगीकरण कक्ष व अलगीकरण कक्ष असे दोन्ही सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

विरार पूर्वेच्या चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात सुरवातीला २५ खाटा या विलगीकरणासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर वसईच्या फादरवाडी येथे ५० खाटांचे अलगीकरणा साठी ठेवण्यात आल्या आहेत.तर जे करोनाची लक्षणे आढळून येणारे संशयित असतील त्यांची तपासणी करण्याचे काम ही आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ४ हजार ४ इतक्या जणांची तपासणी केली आहे.उपचारासाठी डॉक्टर, परिचारिका, व आरोग्य सेविका यांची पथके सज्ज ठेवून त्यांना ही आवश्यक त्या सूचना केल्या असल्याची माहिती पालिकेच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.

काय काळजी घ्यावी

सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास, अंगदुखी, घशामध्ये खवखव, धाप लागणे, तीव्र खोकला असल्यासा करोना चाचणी करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या वाढत्या करोनारुग्णांमुळे प्रत्येकाने मुखपट्टी (मास्क) वापरावा असे पालिकेने सांगितले आहे. नागरिकांनी घाबरू नये मात्र करोना नियमांचे पालन करण्यास सुरुवात करावे असेही पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.

प्राणवायूसाठा उपलब्ध करण्यावर भर

यापूर्वी करोनाच्या संकट काळात वसई विरार शहरात करोनाबाधित रुग्णांना प्राणवायूची अधिक गरज भासली होती.परंतु सुरवातीला पालिकेचे प्रकल्प नसल्याने प्राणवायूची टंचाई निर्माण झाली होती. करोनाचे संकट व भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याच दृष्टीने वसई विरार महापालिकेने  चंदनसार, बोळींज, सोपारा, वसई वरूण इंडस्ट्री अशा चार ठिकाणी पालिकेने प्राणवायू प्रकल्प उभारले आहेत. या चारही प्राणवायू प्रकल्पांची ६३ मॅट्रिक टन इतकी क्षमता आहे.त्यातही आवश्यकतेनुसार त्याचे प्राणवायू बाटले रिफिल करून घेतले आहेत असेही महापालिकेने सांगितले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने बैठक घेऊन करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.  रुग्ण वाढल्यास पुरेसा औषध साठा तयार ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या विरार येथील चंदनसार येथील रुग्णालयात करोनाचा एक विभाग सुरू करण्यात आला आहे. इतर बंद करोना केंद्रे  गरज पडल्यास पुन्हा सुरू केली जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ भक्ती चौधरी, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी