झालं असं की, रेल्वे स्टेशनच्या पुनर्बाधणीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील आले ते काळे कपडे घालून. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन भाषण करणार होते. व्यासपीठावर बसलेल्या भाजपचे सरचिटणीस संजय केनेकर यांनी त्यांच्या कपडय़ावर आक्षेप घेतला. कुजबुज सुरू झाली. रेल्वे विभागाच्या वतीने आमंत्रित केलेल्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि मंत्री अतुल सावेही काहीसे अस्वस्थ झाले; पण प्रसंग रेटून नेत खासदार जलील यांनी भाषण केले. पांढरे कपडे घालणाऱ्यांचे अनेक काळेबेरे व्यवहार पाहिले आहेत, असं जोरदारपणे त्यांनी सांगितले. निषेध करण्याचा कोणताही इरादा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. कपडे कोणते घालायचे याचे स्वातंत्र्य तरी द्या, असेही सुनावले. डॉ. कराड यांची स्तुती करून त्यांना पेचातही पकडण्यासाठी विमान उड्डाणे वाढवा, अशी सूचना जलील यांनी केली. राजकीय कोपरखळय़ा आणि कुरघोडय़ांचे जाहीर प्रदर्शन सुरू झाले आणि मग केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनीही खासदार जलील यांचा उल्लेख ‘औरंगाबाद’चे खासदार असा केला. अजून छत्रपती संभाजीनगरचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, असेही ते म्हणाले. एकच खासदार, पण त्यांची राजकीय विभागणी मात्र जोरदार.

सुरक्षित स्थळी म्हणजे कलेक्टर ऑफिस का?

साताऱ्याच्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील दीड महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावरून एक किस्सा घडला. साताऱ्यात एका राजकीय पक्षाची बैठक होती. यामध्ये एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यात अनेक डोंगराच्या कडेवर पर्यटकांना चांगल्या व्ह्यूची अनुभूती व्हावी म्हणून हॉटेल आहेत. अतिवृष्टीत दरडी केव्हाही पडून पर्यटकांच्या जिवाला धोका पोहोचू शकतो; पण याकडे प्रशासन लक्ष देत नाही. दुसरीकडे प्रशासन लोकांना म्हणते सुरक्षित स्थळी जावा. मग लोकांनी कोठे जावे?

कारण आता सुरक्षित स्थळ (कलेक्टर ऑफिस) जिल्हाधिकारी कार्यालयात राहिलंय. लोकांनी तिथे गेले पाहिजे का? पदाधिकाऱ्यांनी हे वाक्य उच्चारताच सर्व जण हसू लागले.

इच्छुकांची अस्वस्थता

सांगली महापालिकेची मुदत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर पाच दिवसांत म्हणजे २० ऑगस्ट रोजी समाप्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या हातून आता प्रशासकाच्या हाती कारभार जाण्याचे वेध जसे नगरसेवकांना लागले आहेत, तसेच वेध सर्व सत्ताधीश होण्याचे प्रशासनाला लागले आहेत. प्रशासकीय राजवट किती काळ राहील याची सध्या तरी काहीच खात्री देता येत नाही. निवडणुकीची तयारी, प्रभाग रचना या गोष्टी तर अद्याप झालेल्याच नाहीत. यामुळे आजी, माजी, इच्छुकांची मात्र प्रभागातील ऊठबस वाढली आहे. मात्र, विद्यमान महापौर मुदतवाढीसाठी मुंबईवारी करीत आहेत. यासाठी मात्र, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय विद्यमान पदाधिकारी एकमताने महापौरांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. सांगलीचे शांघाय करण्याचे स्वप्नही जसे शहरवासीयांना एके काळी दाखवले, तसेच चोवीस तास स्वच्छ पाणी देण्याचेही एक स्वप्नच उरले आहे. आता मुदतवाढीचे स्वप्न सदस्यांनीही पाहावे, हीच सांगलीकरांनी अपेक्षा ठेवली तर बिघडले कुठे?

खासदारांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे आमदार राम शिंदे हे दोघेही दावा करत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी स्थापनेचा वाद सध्या गाजत आहे. एमआयडीसी मीच स्थापन करणार, असा दावा करत दोघेही एकमेकांच्या प्रयत्नांना खो घालत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा विषय उपस्थित करण्यात आला. विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर तो सहसा मार्गी लागतो, असा नागरिकांचा अनुभव. मात्र कर्जत एमआयडीसीचा प्रश्न विधिमंडळातील चर्चेनंतर अधिकच चिघळला. कर्जत-जामखेडचा समावेश भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात होतो. ‘हा दोन नेत्यांतील वाद आहे, त्यामुळे तिसऱ्याने त्यात उडी घेतली तर तो जास्तच उफाळून येईल,’ असे मत व्यक्त करत खासदार विखे यांनी या वादापासून स्वत:ला अलिप्त ठेवले. मात्र ही अलिप्तता व्यक्त करतानाच त्यांनी, एमआयडीसी स्थापन करण्यापूर्वी तेथे कोण उद्योजक, किती कारखाने येणार, किती रोजगारनिर्मिती होणार, किती गुंतवणूक होणार याचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा केवळ आरक्षण टाकून भूखंड विक्री होईल व रोजगारनिर्मिती केवळ कागदावर राहील, असा टोला लगावला आहे.

शेतकरी दिनाचा गोंधळ

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कृषी क्षेत्रातील कार्याचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन शेतकरी दिन म्हणून ३० ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने ३ ऑगस्ट रोजी घेतला आहे. मात्र शेतकरी दिन आणि विखे पाटील यांचा जन्मदिन याबाबतचा सावळा गोंधळ समोर येत आहे. यापूर्वी शेतकरी दिन २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जात होता. आता शासनाने तो मराठी तिथीप्रमाणे म्हणजे नारळी पौर्णिमेचा जन्मदिवस म्हणून ३० ऑगस्ट ही तारीख मुक्रर केली आहे. तर विखे पाटील महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी विखे पाटील यांचा जन्म १२ ऑगस्ट रोजी झाल्याचे एका लेखात म्हटले आहे.  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर २२ ऑगस्ट रोजी जयंतीनिमित्त अभिवादन करून शेतकरी दिनाच्या शुभेच्छा दिल्याचा संदर्भही पुढे आला आहे. त्यामुळे शेतकरी दिन नेमका कोणता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सहभाग : सुहास सरदेशमुख, विश्वास पवार, दिगंबर शिंदे, मोहनीराज लहाडे, दयानंद लिपारे)