ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. ‘सीएसटीला बॉम्बस्फोट झालाय का?..’ ‘काही कल्पना नाही.. तुम्ही मुंबई पोलिसांशी अथवा महापालिकेशी संपर्क साधा..!’ हे उत्तर होते आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी राज्य सरकारने महापालिकेकडून ‘पळविलेल्या’ टोल फ्री १०८ क्रमांकावरील कर्मचाऱ्याचे. मुंबईतील समस्यांची हमखास माहिती मिळणारी ही सेवा आता राज्य सरकारच्या दावणीला बांधली गेली असून मुंबईशी संबंधित कोणतीही माहिती त्यावर आता मिळेनाशी झाली आहे. नेहमीच्या खाक्याप्रमाणे यासंदर्भात नागरिकांना माहिती देण्याचे किमान सौजन्यही पालिकेने पाळलेले नाही. भरीस भर म्हणजे नागरी समस्यांच्या तक्रारींसाठी १९१६ हा क्रमांक पालिकेने दिला आहे. परंतु तो ‘टोल-फ्री’ नाही. त्यामुळे त्यावर केलेल्या कॉलसाठी नागरिकांनाच भरुदड पडत आहे.
केंद्र सरकारने देशभरातील आपत्कालीन व्यवस्थापनासाठी टोल फ्री क्रमांक १०८ राखून ठेवल्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी तो कार्यान्वित केला आहे. मुंबई महापालिकेला २००३ मध्ये हा क्रमांक मिळाला. महापालिका स्वत:च ही सेवा चालविते. त्यासाठी पालिकेने आपल्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना स्पॅनको कंपनीकडे प्रशिक्षणासाठी धाडले. २००३ पासून २०१४ पर्यंत महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग अत्यंत प्रभावीपणे १०८ ही सेवा राबवीत आहे. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णालये, पालिकेची २४ विभाग कार्यालये आदी ४७ यंत्रणांशी १०८ क्रमांक जोडण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागात १०८ ला ३० हंटिंग लाईन जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी ३० जणांनी फोन केला तरीसुद्धा सेवा अखंड सुरू राहते.
बॉम्बस्फोट, वाहतुकीचा खोळंबा, रेल्वे समस्या, इमारत कोसळणे, आग, झाडे पडणे, रस्ता खचणे, जलवाहिनी फुटणे, झाडावर अडकलेल्या पक्ष्याची सुटका करणे आदी विविध तक्रारी या क्रमांकावर येत असतात. पावसाळ्यात नागरिकांसाठी हा क्रमांक अतिशय सोयीचा ठरत असे. पावसाळ्यात रोज सुमारे एक हजार, तर इतर दिवशी सुमारे ५०० तक्रारी या क्रमांकावर येत असत.
या क्रमांकावर संपर्क साधताच तात्काळ अन्य यंत्रणांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केले जात असे. आपत्कालीन व्यवस्थापनात गोंधळ उडू नये यासाठी संपूर्ण घटनेवर नियंत्रणाचे कामही या विभागामार्फत केले जात होते. त्यामुळे मुंबईतील अनेक दुर्घटनांवर अल्पावधीत मात करणे शक्य होत होते. १०८ वर आलेला फोन दुसऱ्या रिंगला उचलला नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता. त्यामुळे शक्यतो पहिल्याच रिंगला हा फोन उचलला जायचा आणि अगदी सौजन्याने संवाद साधून तक्रारदाराच्या तक्रारीची नोंद व्हायची.
या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी दिलेला हा क्रमांक आता राज्य सरकारने महापालिकांकडून काढून घेऊन आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेसाठी दिला आहे. महापालिकांकडील हा क्रमांक २६ जानेवारी रोजी बंद करण्यात आला. ‘नॅशनल रुरल हेल्थ मिशन’अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी पुण्यामध्ये हा क्रमांक कार्यान्वित झाला आहे. मात्र आजही मुंबईत दुर्घटना घडल्यानंतर अनेक नागरिक १०८ वर संपर्क साधून तक्रार वा चौकशी करतात. पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आमच्याकडे माहिती नाही, मुंबई पोलिसांना अथवा महापालिकेशी संपर्क साधा, असे सांगून फोन बंद केला जात आहे.
१०८ क्रमांक काढून घेताना पालिका आयुक्तांनी एका शब्दानेही खळखळ केली नाही. राज्य सरकारच्या पुढे नमते घेऊन ही महत्त्वपूर्ण सेवा त्यांनी सरकारला बहाल करून टाकली. महापालिकेचा नागरी समस्यांच्या तक्रारींसाठी १९१६ क्रमांक कार्यान्वित आहे. त्याचाच आता आपत्कालीन व्यवस्थापनविषयक तक्रारींसाठी वापर करावा लागत आहे. त्यामुळे या सेवेवर प्रचंड ताण येऊ लागला आहे.