दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातात अशोक पाळेकर आणि त्यांचे चुलत सासरे वासुदेव पवार हेही गावी चालले होते.  रेल्वेने नागोठणे सोडले आणि त्यांना अपघाताला सामोरे जावे लागले.
तिकीट आरक्षित नसल्यामुळे अशोक पाळेकर हे दरवाज्याजवळ येऊन उभे राहिले, तर वासुदेव पवार हे आतील गर्दीत कशीबशी जागा मिळवून बाकडय़ाच्या एका कोपऱ्यावर बसले होते. भिसे खिंडीजवळ अचानक गाडीला एक मोठा जोरदार झटका बसला आणि इंजिनसह चार ते पाच डबे वेगाने घसरले. दरवाजात असलेल्या अशोक पाळेकर यांच्या बाजूलाच ते डबे कलंडल्याने पाळेकर यांना काही कळायच्या आतच ते डब्यासह खाली फेकले गेले. अनेक प्रवासी अंगावर येऊन पडले. आपण खोल दरीत पडतोय असा भास पालेकर यांना  झाला, पण दुसऱ्याच क्षणी डब्याचा भाग आपल्या पायावर पडल्याची जाणीव त्यांना झाली. बाहेरचे काहीही दिसत नव्हते. डोळे किलकिले करून पाळेकर यांनी बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थच ठरला.
अचानक आजूबाजूने काही जणांचा किंकाळ्यांचा, तर काहींचे कण्हण्याचे आवाज येत होते. त्याही स्थितीमध्ये पाळेकर यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर पोहोचू शकत नव्हता. याच वेळी त्यांच्याबरोबर असलेल्या वासुदेव पवार यांनी मात्र कसे तरी बाहेर पडण्यात यश मिळाले, पण त्यांना पाळेकर यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. पाळेकर यांच्या मोबाइलवरही त्यांनी संपर्काचा प्रयत्न केला, पण तोसुद्धा बंद होता. त्यामुळे पाळेकर यांचे काही बरेवाईट झाले असावे, असा पवार यांचा समज झाला. पाळेकर जिथे पडले होते त्यांच्या आजूबाजूला असलेल्या अनेकांनी प्राण सोडले होते. आपण एकमेवच जिवंत असून बाजूला असलेले सर्व जण मृत झाल्याचे लक्षात येताच पाळेकर यांना दरदरून घाम फुटला. जिवाच्या आकांताने ते ओरडू लागले, पण आवाज काही वर पोहोचत नव्हता. असे एक नव्हे तब्बल तीन ते चार तास मृतदेहांच्या सान्निध्यात काढल्यानंतर क्रेनच्या मदतीने जेव्हा तो डबा उचलला गेला त्या वेळी पाळेकर जिवंत माणसांच्या दुनियेत परतले. या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. वासुदेव पवार यांचा खांदा निखळला आहे. मृतदेहांच्या सान्निध्यातील ते चार तास भयंकर होते. आयुष्यात कधीही ते विस्मृतीत जाणार नाहीत, अशी पाळेकर यांची भावना आहे.