पावसाळ्यात उखडले गेलेले आणि नंतर केवळ मलमपट्टी केलेले शहरातील अनेक रस्ते सध्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा संपुष्टात येऊन दीड महिना लोटूनही महापालिका त्यांची दुरुस्ती करू शकलेली नाही. परिणामी, खडतर मार्गावरून मार्गक्रमण करण्याची कसरत आजही वाहनचालकांना करावी लागत आहे. दरम्यान, आचारसंहिता संपल्यावर रखडलेल्या विकासकामांनी ही शहर परिसरात गती घेतली आहे.
पावसाला सुरुवात होण्याआधी शहरातील बहुतांश रस्ते चकचकीत होते. पण, रिमझिम पाऊस सुरू झाल्यावर त्याचे रुप बदलण्यास सुरुवात झाली. विविध भागातील डांबरी रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले. यामुळे त्या काळात दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागले होते. यावरून ओरड सुरू झाल्यावर पालिकेची यंत्रणेने नेहमीप्रमाणे रस्त्यांवरील खड्डय़ांची तात्पुरती डागडुजी केली गेली होती. उन्हाळ्यात अनेक रस्त्यांच्या झालेल्या खोदकामाचा फटका शहरवासीयांना आजही बसत आहे. खोदकाम झाल्यावर त्याचे डांबरीकरण करण्याची तसदी घेतली गेली नाही. परिणामी, अनेक रस्त्यांवरील तो भाग पावसाळ्यात चिखलमय झाला. या ठिकाणी दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले होते. शहर परिसरातील द्वारका, गंगापूर रोड, सिडको, अंबड औद्योगिक समुह, मुंबई-आग्रा महामार्ग, पंचवटी परिसरातील अनेक रस्त्यांवर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले होते. द्वारका परिसरात उड्डाणपुल आणि काही विकास कामांमुळे खड्डे खोदण्यात आले. काही ठिकाणी ते बुजविले तर काही ठिकाणी तसेच ठेवले गेले. माती व मुरुम टाकून सर्वत्र तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. पावसाळा संपल्यावर खडतर बनलेल्या रस्त्यांच्या त्या भागात डांबरीकरण केले जाईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र अद्याप खडीच्या, मातीच्या रस्त्यावरून वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. बऱ्याचदा मोकळ्या खडी मुळे वाहन घसरण्याचे, खडी चे बारीक कण डोळ्यात जात असल्याने अपघातांना आपसूक आमंत्रण मिळत आहे.  तथापि, आजतागायत रस्त्यांवरील या स्थितीकडे कोणी ढुंकनही पाहिले नाही. पावसाळ्यात केलेल्या डागडुजीवर कायमस्वरुपी काम केले जाईल की नाही याबद्दलही स्पष्टता होत नाही. अनेक रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डेमय बनलेले काही भाग सध्या खडतर झाल्याचे दिसते. ठिकठिकाणी अशी ठिगळ लागली आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गस्थ होताना वाहनधारकांची कसरत पावसाळा संपल्यानंतरही कायम आहे.
दुसरीकडे, आचारसंहिताचा संपल्यानंतर महापालिकेची विविध रखडलेली विकास कामे आता वेगाने सुरू झाली आहेत. यामुळे शहर परिसरातील सिडको, सातपूर यासह अन्य ठिकाणी भुमीगत गटारी वा तत्सम काही कामासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू झाले आहे. मुळात पावसाळ्या आधी सुरू झालेली कामे पुर्ण नसतांना नव्या कामांचा सोस कशाला असा सवाल नागरीकांकडून होत आहे. महापालिकेच्या खोदकामामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.