एअर इंडियाच्या हजारो कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणारी मोफत तिकिटे वाढविण्यात आली आहेत. मात्र ‘विमानतळ शुल्क’ किंवा कराचा दोन-चार हजार रुपयांचा भरुदड प्रत्येक तिकिटामागे सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोफत व सवलतीच्या दरातील तिकिटांची संख्या कमी करावी, पण कराचा बोजा व्यवस्थापनाने स्वीकारावा, अशी मागणी कर्मचारी करीत असून संघटनेमार्फतही त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
एअर इंडियाच्या सेवेत सुमारे २४ हजार कर्मचारी असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. प्रत्येकाच्या वेतनश्रेणीनुसार मोफत किंवा सवलतीच्या दरात दरवर्षी कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांना मोफत विमानप्रवासाची तिकिटे मिळत होती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दोन मोफत तर चार सवलतमूल्याची अशी सहा तिकिटे मिळत  होती. या सर्वासाठी मोफत तिकिटांची संख्या वाढविण्यात आली असून आता १६ मोफत तिकीटे मिळणार आहेत. मात्र विमानतळ शुल्काचा भार आता कर्मचाऱ्यांना उचलावा लागणार आहे. याआधी हा भार त्यांच्यावर नव्हता.
मुंबई-दिल्ली प्रवासासाठी कर्मचाऱ्याला प्रत्येक तिकिटामागे २३७० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तिकिटाच्या रकमेनुसार हा कर आहे. विमानतळ देखभाल व व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हे शुल्क वाढले आहे. मोफत तिकिटांची संख्या कमी करून या शुल्काचा भार कर्मचाऱ्यांवर पडू नये, अशी त्यांची मागणी आहे.