वंजारी समाज हा संघर्ष करून पुढे आलेला समाज असून या समाजाला इतिहास व भूगोल नसला तरी भविष्य मात्र निश्चित असल्याचे प्रतिपादन समाजनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी करून अन्याय व अत्याचाराविरुद्ध संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विदर्भ वंजारी समाजसेवा परिषदेच्यावतीने शेगाव येथे गुरुवार, १६ जानेवारीला समाज मेळाव्याचे आयोजन कुणबी मंगल कार्यालयाच्या परिसरात करम्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड होते. यावेळी आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, माजी आमदार तोताराम कायंदे, जगन्नाथ धात्रक, दगडू पाटील बढे, गोविंद केंद्रे,  उषाताई दराडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार मुंडे म्हणाले, वंजारी समाज लढवय्या आहे, पण तो संख्येने कमी असल्यामुळे फारशी दखल घेतली जात नाही. मी जर दुसऱ्या जातीत जन्माला आलो असतो तर कधीचाच मुख्यमंत्री झालो असतो. मला काहीही मिळाले नाही तरी चालेल, पण वंजारी असल्याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे. मोडेन पण वाकणार नाही, हा माझा बाणा असून मला पाडण्याची हिंमत कोणात नाही. तरी तरुणांना संधी देण्यासाठी सचिनप्रमाणे योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेईल, असे सुतोवाच त्यांनी केले.
विदर्भ वंजारी समाजसेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ यांनी प्रास्ताविकातून मेळाव्यामागची भूमिका विषद करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी गोपीनाथराव मुंडे विराजमान व्हावे, म्हणून हा मेळावा नागपूरऐवजी संत गजानन महाराजांच्या चरणी शेगाव येथे आयोजित केला असल्याचे सांगितले. वंजारी समाजबांधवांना संघटित करून एका नेतृत्वाखाली आणण्यासाठी हा मेळावा असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड भास्करराव आव्हाड यांनी अध्यक्षीय मनोगतात यावेळी सामाजिक गुणदोषांवर बोट ठेवून प्रबोधनात्मक भूमिका विषद केली.
उषाताई दराडे व बाळासाहेब दराडे यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमासाठी विदर्भ वंजारी समाजसेवा परिषदेचे कोषाध्यक्ष भाऊराव करपे, सरकार्यवाह प्रभाकर कापकर, उपाध्यक्ष मधुकर जायभाये, लक्ष्मीकांत धात्रक, सरकार्यवाह पंजाबराव इलग, जिल्हाध्यक्ष डिगांबर हुसे, सचिव शरद नागरे आदिंनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनेक समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला.
वंजारी समाज स्मरणिका व दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या मेळाव्याच्या अनुषंगाने सामाजिक विषयांवर उद्बोधनही झाले. राधाबाईने अध्यात्मावर, तर प्रवीण गीते यांनी स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भातील विषयावर मार्गदर्शन करून समाजबांधवांचे लक्ष वेधून घेतले.