लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोलीतून दिल्लीदरबारी अधिक वजन असणारे राजीव सातव यांचे नाव चर्चेत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी कंबर कसली. त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीकडूनच विलास गुंडेवार यांनीही उमेदवारीसाठी बाहय़ा सरसावल्या आहेत. याच जागेची अदलाबदल होईल आणि जालन्यातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटेल, असा अंकुशराव टोपे यांचा होरा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार गुडघ्याला बािशग बांधून तयार आहेत.
हिंगोली मतदारसंघातून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांचे नाव निवडणूक निरीक्षकांपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचविण्याचा काँग्रेसी रिवाज नुकताच पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांता पाटील चांगल्याच चिडल्या. त्यांनी राजीव सातव यांना अजून बरेच राजकारण शिकायचे आहे, असेही सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलास गुंडेवार आणि राजीव सातव यांची भेट झाली आणि बंद खोलीत चर्चा झाल्याचे वृत्त जिल्हाभर पसरले. माजी खासदार गुंडेवार यांनी गुरुवारी पत्रकार बैठक बोलावून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून इच्छुक असल्याचे सांगितले. उमेदवारीही मिळणार, असा दावा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी राहणारच, त्यामुळे लोकसभेची जागा लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. याच जागेसाठी अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तीन-तीन उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मतदारसंघाचा मीच एकमेव अभ्यासू उमेदवार असल्याचे गुंडेवार यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळेलच, असेही ते म्हणाले. या वेळी नगरपालिकेचे उपाध्यक्ष शेख निहाल, कळमनुरीचे नागोराव करंडे, बाबुराव वानखेडे आदींची उपस्थिती होती.