धोकादायक इमारती पडण्याच्या घटनांमुळे पालिकेने या इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र हलवण्याची, या इमारती पाडण्याची मोहीम तीव्र केली असली तरी दरवर्षी पावसाळय़ात मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या दरडींकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. यावर्षीही मुंबई महानगरपालिका क्षेत्रात
दरड पडण्याचा धोका असलेली २६६ ठिकाणे हेरण्यात आली आहेत. मात्र नोटीस देण्याचा कागदोपत्री सोपस्कार सोडला तर या समस्येवर परिणामकारक उपाययोजना करण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे २६६ ठिकाणांवरील सुमारे २० हजार झोपडीधारकांवरही या पावसाळ्यात मृत्यूची टांगती तलवार असणार आहे.
पावसाळा तोंडावर आला की, दरवर्षी धोकादायक इमारती, दरडी पडण्याची शक्यता असलेल्या जागा जाहीर केल्या जातात व तिथे नोटीस पाठवली जाते. गेल्या वर्षभरात धोकादायक इमारती पडण्याच्या चार घटना घडल्याने पालिका याबाबत अधिक सजग झाली आहे. यावर्षी अतिधोकादायक असलेल्या ५९३ इमारतींसह १२३६ इमारतींमधील रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस लावण्यात आली आहे. आयुक्तांनी स्वत ४१ इमारतींची पाहणी केली व पालिकेने या इमारतींना दुसरी नोटीस बजावली. मात्र त्याच वेळी दरडींबाबत मात्र सर्वानीच ‘अळीमिळी गुपचिळी’ ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाहणी करून पालिकेने दरडी पडणाऱ्या जागांची नोंदणी केली. त्यानुसार सुमारे २६६ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यातील निम्म्याहून अधिक जागा घाटकोपर-भांडुप-विक्रोळी या भागांतील आहेत. हाजीअली, अँटॉप हिल, साकीनाका परिसरांतही दरडी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र ज्याप्रमाणे धोकादायक इमारतींमधून रहिवासी घर सोडत नाहीत, त्याचप्रमाणे या झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत पडला आहे.
दरडी कोसळून जीवित किंवा वित्तहानी झाली की अनधिकृत झोपडय़ांना दोष दिला जातो. मात्र पालिकेचे अधिकारी व नगरसेवक यांच्या संगनमतानेच या झोपडय़ा उभ्या राहतात हे वास्तव आहे. डोंगर पोखरत जाऊन झोपडय़ा वाढत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याची शक्यता वाढत जाते.
घरांमधून कोणालाही बळजबरी बाहेर काढता येत नाही. तसेच झोपडय़ांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे कठीण आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधली गेली आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. झोपडय़ांच्या प्रश्नांबाबत पालिका व राज्य सरकार एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. शहरात जागांच्या किमती पाहता कोणीही घर सोडून जायला तयार नसते. पालिकेने वीज, पाणी कनेक्शन तोडले तरी अनेक इमारतींमधून रहिवासी घर खाली करत नाहीत. तेथे झोपडपट्टीतील नागरिकांची काय कथा! जीव धोक्यात घालूनही दरडीच्या खाली झोपडय़ांमधून राहणारे लोक तेथून हटायला तयार नसतात. यावर्षीही ही परिस्थिती कायम आहे.
दरड कोसळून झालेल्या काही दुर्घटना
४ सप्टेंबर, २००९    – साकीनाका – १० ठार
१७ ऑगस्ट, २०१०     – साकीनाका – एक ठार
२९ ऑगस्ट, २०११     – हाजी अली – एक ठार
१० जुलै, २०१३     – अँटॉप हील – पाच ठार
आधारभिंतीसाठी नगरसेवकांना निधी हवा
आधारिभती बांधण्यासाठी पालिकेकडून कोणताही विशेष निधी दिला जात नाही. मात्र नगरसेवकांच्या विकासनिधीतून आम्ही काही ठिकाणी लहान स्वरूपाच्या िभती बांधून देतो. म्हाडाकडून आमदारांना या िभती बांधण्यासाठी निधी दिला जातो. तसाच तो नगरसेवकांनाही दिला जावा, अशी आम्ही मागणी केली होती, मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
अनिषा माजगावकर, नगरसेविका, भांडूप.
आधारभिंत संरक्षणासाठी कुचकामी
आधारिभत बांधल्याने दरड कोसळण्याची शक्यता राहतेच. त्यामुळे अनेक ठिकाणी िभती बांधल्या गेल्या असल्या तरी दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणांची संख्या कमी होत नाही. आधारिभतीमुळे दगड खाली येण्याला किंवा माती कोसळण्याला अटकाव होतो. मात्र मोठी दरड कोसळल्यास या िभतीचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे या जागा आपत्कालीन व्यवस्थेसाठी लक्षात घ्याव्या लागतात.
महेश नार्वेकर,आपत्कालीन व्यवस्थापन विभागप्रमुख