रामायण, महाभारत यावर आधारित मालिकांनी ८० व ९० च्या दशकात दूरदर्शनला तुफानी लोकप्रियता मिळवून दिली होती. रविवार सुट्टीच्या दिवशी दाखविण्यात येणाऱ्या या मालिकांच्या प्रसारणाच्या वेळी तेव्हा रस्त्यांवर शुकशुकाट होत असे. भारतीयांना पौराणिक कथा, ऐतिहासिक गोष्टी याविषयी अभिमान आणि आदर आहे. त्या गोष्टी वाचायला, ऐकायला, पाहायला आवडतात. म्हणूनच बच्चेकंपनीसाठीच्या वाहिन्यांनी अ‍ॅनिमेशन मालिकांद्वारे पौराणिक व्यक्तिरेखा आणल्या त्यालाही बच्चेकंपनीकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. आता टेलिव्हिजनवर शेकडो वाहिन्यांची भाऊगर्दी झाल्यामुळे प्रेक्षकवर्ग विभागला गेला आहे. यावर धंदेवाईक तोडगा काढण्याबरोबरच वेगळी वाहिनी म्हणून फक्त पौराणिक, लोककथा, ऐतिहासिक दंतकथा, ऐतिहासिक पर्व यावर आधारित मालिका, कार्यक्रम यांची रेलचेल असलेली ‘एपिक’ ही नवी वाहिनी लवकरच दाखल होणर आहे.
जनरल एण्टरटेन्मेंट कॅटेगिरी (जीईसी) मधील वाहिन्यांची प्रचंड भाऊगर्दी आहे. त्यातच चार-चार समांतर कथानके असलेल्या भयंकर मेलोड्रामा असलेल्या बटबटीतपद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या वाहिन्यांना आता प्रेक्षक सरावला आहे तसाच तो कंटाळलाही आहे. बच्चेकंपनी, धार्मिक गोष्टी, हाणामारी अशा विविध प्रकारच्या वाहिन्यांपेक्षा जीईसी वाहिन्या अधिक लोकप्रिय असल्या तरी हळूहळू वैशिष्टय़पूर्ण आणि आपल्याला आवडेल तेच पाहण्याकडे कल वाढतोय हे जोखूनच ‘एपिक’ ही वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे मल्टिप्लेक्समुळे प्रेक्षकांचा चित्रपट पाहण्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याचप्रमाणे डिजीटायझेशनमुळे टीव्हीवरील आपल्याला आवडतील अशा वैशिष्टय़पूर्ण वाहिन्या, कार्यक्रम पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढेल असा विश्वास वाटतो. म्हणूनच फक्त आणि फक्त भारतीय इतिहास, पुराणकथा, लोककथा यावर आधारित कार्यक्रम असणारी ‘एपिक’ ही वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एपिक टेलिव्हिजन नेटवर्क प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक महेश सामत यांनी सांगितले. सर्व डीटीएच नेटवर्कवर ही वाहिनी ऑगस्टपासून दिसणार असून सर्व कार्यक्रम हायडेफिनिशनमध्ये चित्रीत केले जाणार आहेत.