भरधाव वेगाने धावून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या टँकर्सची समस्या काही केल्या सुटत नसल्यामुळे रेशीमबागेतील नागरिकांच्या मनात असलेल्या संतापाचा आज उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड करून या कार्यालयाला टाळे लावले. यापुढे या भागातून टँकर धावणार नाहीत असे लेखी आश्वासन कंपनीने दिल्यानंतर हा उद्रेक शांत झाला.
रेशीमबागेतील पाण्याच्या टाकीवरून दररोज शेकडो टँकर पाणी भरून घेऊन जातात. उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई समजण्यासारखी असली, तरी पावसाळ्यात व हिवाळ्यातही टँकर्सची संख्या कमी होत नसल्याने या पाण्याचा व्यावसायिक उपयोग होत असावा अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. मोठय़ा संख्येतील हे टँकर्स येथील रहिवाशांची व पादचाऱ्यांची पर्वा न करता भरधाव वेगाने धावतात. शिवाय ते टाकीच्या परिसरातील रस्ते व्यापून टाकत असल्याने इतर वाहनांना तेथून जाण्यात रोजच अडचण होत असते. टँकर्सचे चालक ज्या भाषेत बोलतात, त्यामुळे येथून महिलांचे जाणे-येणे बंद झाल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.
तीन वर्षांंपूर्वी टँकरमुळे अपघात झाल्याने नागरिकांचा असंतोष उफाळून आल्यामुळे येथे पोलिसांची नियमित गस्त सुरू झाली होती. काही दिवस टँकर्स शिस्तीत वागले, परंतु पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ची परिस्थिती आली. हे टँकर्स डिसेंबर २०१२ पर्यंत दुसरीकडे वळवले जातील, असे आश्वासन ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिले होते, परंतु एक वर्ष उलटूनही ते पूर्ण झाले नाही. यामुळे टँकरचालकांची दादागिरी वाढून ते कुणालाही जुमानेनासे झाले. रविवारी येथील प्रा. कडू यांच्या मुलीला एका भरधाव टँकरने धडक दिली. यात तिचा पाय मोडला आणि ती टँकरच्या चाकात अडकली. नागरिकांनी तिला बाहेर काढले असता टँकरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
आज सकाळी हाच टँकरचालक पुन्हा पाणी भरण्यासाठी आलेला दिसल्याने नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. त्यांनी महापालिकेच्या आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली, परंतु कुणीही घटनास्थळी आले नाही. त्यामुळे या भागाचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक पाण्याच्या टाकीजवळ एकत्र आले. त्यांनी दोन टँकर्सवर तसेच ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सक्करदरा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर यांच्यासह पोलिसांचा ताफा या परिसरात पोहचला. नागरिकांचा असंतोष पाहून त्यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कसाधला, परंतु दोन तासपर्यंत कुणीच तेथे पोहचले नाही. अखेर परिस्थिती चिघळल्यानंतर ओसीडब्ल्यूचे पवन शरण या ठिकाणी आले. यापुढे या ठिकाणाहून टँकर्स धावणार नाहीत, असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नागरिकांचा राग शांत झाला. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या टँकरचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
टँकरचालकांविरुद्ध नागरिकांच्या संतापाचा उद्रेक
भरधाव वेगाने धावून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या टँकर्सची समस्या काही केल्या सुटत नसल्यामुळे रेशीमबागेतील नागरिकांच्या मनात

First published on: 31-12-2013 at 08:06 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lock on ocw office