मोठा गाजावाजा करून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सुरू केलेल्या मोबाइल तिकीट प्रणालीकडे प्रवाशांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मोबाइल तिकीट योजना सुरू झाल्यानंतर त्याच दिवशी या प्रणालीच्या आधारे ४४ तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांनी पुढील दोन दिवसांत मात्र फक्त १५ तिकिटे घेण्यासाठी ही प्रणाली वापरली आहे. अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यापासून तिकीट छापण्यासाठी एटीव्हीएम यंत्रासमोर रांगा लावण्यापर्यंत ही सर्वच प्रक्रिया किचकट असल्याचे प्रवाशांचे मत आहे. त्यामुळे या मोबाइल तिकीट योजनेला थंडा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, रेल्वे प्रशासन चिंतेत आहे.
रेल्वेने शनिवारी दुपारी दादर रेल्वे स्थानकात या मोबाइल तिकीट योजनेचे लोकार्पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते केले. मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावर दादर स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठीच मोबाइल तिकीट योजना सध्या उपलब्ध आहे. या योजनेचे लोकार्पण झाल्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी या तिकीट प्रणालीच्या आधारे मध्य रेल्वेवरील ४४ आणि पश्चिम रेल्वेवरील दोन प्रवाशांनी तिकीट काढले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दरदिवशी तिकीट काढणाऱ्यांची संख्या ७६ ते ८० लाखांच्या घरात आहे. त्यात दरदिवशी तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या मध्य रेल्वेवर ११ लाख आणि पश्चिम रेल्वेवर ९ लाख एवढी आहे. तिकिटाच्या रांगेपासून या प्रवाशांची सुटका व्हावी, यासाठी सुरू केलेल्या या प्रणालीमध्ये अनेक समस्या असल्याचे समोर आले आहे. यातील मुख्य समस्या म्हणजे मोबाइलवर काढलेले तिकीट छापण्यासाठी रांगेत उभे राहावे लागण्याचा जाच! त्यामुळे प्रवाशांनी या प्रणालीकडे पाठ फिरवली आहे.
दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे, अद्याप ही प्रणाली फक्त दादर स्थानकातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर प्रत्येकी पाच म्हणजेच दहा स्थानकांमध्ये ही प्रणाली दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र रेल्वे त्याबाबत अजून प्रयत्न करत असून लवकरच या स्थानकांमध्ये ही प्रणाली दिली जाणार आहे. तोपर्यंत केवळ दादर स्थानकात असलेल्या या प्रणालीला थंडा प्रतिसादच मिळणार असल्याची शक्यता आहे.