महायुतीशी फ टकून वागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीच्याच अभेद्य किल्ल्यावर हल्ला चढविण्याचे निश्चित केले असून, पक्षनेते आमदार बाळा नांदगावकर यांच्या दौऱ्यात दोन आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य निर्धारित झाले आहे.     
महायुतीशी फ टकून वागण्याचे चित्र गेल्या काही दिवसात मनसेबाबत उमटले आहे. आघाडीसोबतच युतीलाही विरोधक ठरविण्याची भूमिका घेणाऱ्या मनसेने कांॅग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्य़ात मात्र युतीला प्रथम क्रमांकाचे लक्ष्य केल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्य़ातील हिंगणघाटला सेनेचे आमदार अशोक शिंदे, तर आर्वीला भाजपचे आमदार दादाराव केचे आहेत. वर्धा व देवळी आघाडीकडे आहे. कॉंग्रेस विरोधी मते युतीला जाण्याऐवजी मनसेला मिळावी म्हणून आर्वी व हिंगणघाट या दोन मतदारसंघात आगेकूच करण्याचा चंग स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बांधला. त्यास आमदार नांदगावकर यांची संमती मिळाली.
प्राप्त माहितीनुसार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतांना आमदार नांदगावकर यांनी स्पष्ट केले की, जातीवर नव्हे, तर सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन निवडणुकांना सामोरे केल्यास यश सोपे होईल. दिवं. बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्ता हेच खरे भांडवल असल्याचा मला दिलेला संदेश पुढे कामी आला. माझ्या मतदारसंघात ८० टक्के मतदार मुस्लिम आहेत, पण केवळ काम हाच आधार पाहून मला मते मिळत आली आहेत, असे स्पष्ट करणाऱ्या आमदार नांदगावकर यांनी वर्धा जिल्ह्य़ातील तेली-कुणबी राजकारणावर अपरोक्ष भाष्य केले. याच बैठकीत पक्षाच्या विदर्भव्यापी आंदोलनात वर्धा जिल्ह्य़ात वाटा लक्षणीय राहिल्याचे आवर्जून सांगणारे हेमंत गडकरी यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा इशारा दिला. गेल्या आठ वर्षांंपासून मनसेचे वर्धा जिल्ह्य़ात बळ वाढत आहे, असे जिल्हाप्रमुख अजय हेडावू यांनी स्पष्ट करतांना िहगणघाट मतदारसंघाप्रमाणेच आर्वी विधानसभा मतदारसंघ बळकट करण्याचा विचार मांडला.
आर्वीत कांॅग्रेसला प्रथमच धक्का देणाऱ्या भाजपच्या दादाराव केचेंना यापुढे आव्हान देण्याचे ठरविणाऱ्या मनसे नेत्यांना आर्वी ग्रामीण क्षेत्रात कांॅग्रेसचेही मोठे आव्हान आहे. हिंगणघाट हा परंपरागत कांॅग्रेसविरोधी मतदारसंघ राहिलेला आहे. शेतकरी संघटना, सेना, राष्ट्रवादी या ठिकाणी आलटून पालटून यश मिळत गेले. जिल्ह्य़ात कांॅग्रेस विरोधकांचा बालेकिल्ला असणाऱ्या हिंगणघाटवर कब्जा करणे त्यामुळेच मनसे नेत्यांना सोपे वाटते. कांॅग्रेसचे मतदारसंघ हिसकावण्यात ताकद लावण्यापेक्षा विरोधकांसाठी सोपे ठरणाऱ्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका त्यातूनच पुढे आली आहे. हिंगणघाट पालिकेत, तसेच विविध ग्रामपंचायतींवर मनसेचे झेंडे फ डकले आहेत. सेना आमदार अशोक शिंदे हे तीन वेळा निवडून आल्यानंतर आता त्यांच्यावर प्रस्थापिताचा शिक्का बसल्याचे म्हटले जाते. गतवेळी त्यांना एका अपक्ष उमेदवाराने लढत देत नाकी नऊ आणले होते. यावेळी अपक्ष उमेदवाराऐवजी मनसेचा उमेदवार लढतीत आणण्याची तयारी मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी ठेवली आहे.