लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येलाच मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये पक्ष संघटनेत स्थानिक पातळीवर आमुलाग्र बदल करण्यात आले. मनसेच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अॅड. राहुल ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर व जिल्ह्यातील मनसेच्या सर्व प्रमुख पदांवर प्रदेश सरचिटणीस तथा आ. वसंत गिते यांच्या गटाचे प्राबल्य होते. त्यास छेद देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आ. उत्तम ढिकले यांच्या पुत्रास शहराध्यक्षपद बहाल केले. या व्यतिरिक्त उपशहराध्यक्षपद भूषविणाऱ्या शर्वरी लथ यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी तर स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी अविनाश अभ्यंकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी विधानसभेत तीन आमदार पाठविणाऱ्या नाशिकच्या महापालिकेची सत्ता काबीज करण्यात मनसेला यश मिळाले होते. परंतु, पुढील काळात नाशिकमध्ये हा प्रभाव ओसरू लागला. आ. वसंत गिते आणि आ. नितीन भोसले यांच्यातील सख्य सर्वश्रुत आहे. आ. भोसलेंकडे असणारे शहराध्यक्ष काढून त्यावर समीर शेटय़े यांची वर्णी लावण्यात गतवेळी आ. गिते गटाला यश मिळाले होते. परंतु, शेटय़े हे प्रकृतीच्या कारणास्तव काम करू शकले नाहीत. त्यांच्यावर मध्यंतरी शस्त्रक्रियाही झाली. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे मनसेच्या शहराध्यक्षपदासाठी नवीन नावाचा शोध सुरू झाला. लोकसभा निवडणुकीच्या आधी शहराध्यक्ष बदलल्यास वेगळा संदेश जावू शकतो हे लक्षात आल्यावर ही निवड लांबणीवर टाकली गेल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या कामात अनेकांनी रस दाखविला नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे मागील आठवडय़ात राज यांनी राजगड या मनसेच्या कार्यालयात प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्रपणे चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आ. उत्तम ढिकले यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती.
या घडामोडीनंतर पाच दिवसात शहराध्यक्ष पदासह संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात आले. गुरूवारी मुंबईत राज यांच्या उपस्थितीत स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात अॅड. राहुल ढिकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रभाग क्रमांक १२ अ मधून महापालिकेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ढिकले यांचे वडील उत्तम ढिकले हे आमदार आहेत. राज यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत आ. ढिकले यांनी पक्षाची स्थिती बिकट होत असल्याकडे लक्ष वेधले होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी मनसेने संघटनात्मक पातळीवर बदल करण्याचा निर्णय अंमलात आणला.
संपर्क प्रमुखपदी अखेर नियुक्ती
नाशिकच्या संपर्क प्रमुखपदी मुंबईवरून कोणी नियुक्त केले जाऊ नये असा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आजवर प्रयत्न राहिला. पक्ष स्थापनेनंतर सुरूवातीच्या काळात या पदावर बाळा नांदगावकर यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले जात होते. परंतु, तत्कालीन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पदाची आवश्यकता नसल्याचे सांगून नांदगावकर यांना कामच करू दिले नाही. मध्यंतरी या पदावर नितीन सरदेसाई यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले गेले. हे पद म्हणजे मनसेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या कामांवर मुंबईवरून नजर ठेवण्यासाठी निर्मिले गेल्याची काहींची भावना आहे. लोकसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडी लक्षात घेऊन राज यांनी या पदावर आपले विश्वासु सहकारी अविनाश अभ्यंकर यांची नियुक्ती केली. याद्वारे स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत मतभेद वा कलह नियंत्रणात राखण्याची तजविज केली गेल्याची चर्चा आहे.