डॉ. नरेंद्र दाभोलकर अजातशत्रू आणि निर्भीड कार्यकर्ते होते. समाजाचे प्रबोधन करत असताना त्यांचा एक वैचारिक असा संघर्ष होता. राज्यात लोकशाही मार्गोनेच याचे उत्तर देण्याची प्रथा असून महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एखाद्या कार्यकर्त्यांची हत्या होणे यापेक्षा वाईट स्थिती कोणतीच नाही. दाभोळकरांची हत्या कोणी केली, यापेक्षा ती का केली हे जास्त दुखदायक आहे, असे विचार अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर संघटनांच्यावतीने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत विविध वक्तयांनी मांडले.
 डॉ. दाभोलकर यांचा वेगवेगळ्या चळवळींशी संबंध होता. त्यांचे अनेकांशी प्रेमाचे संबंध होते. दूरध्वनीच्या माध्यामातून त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता. आपल्या घरातील एखादी जवळची व्यक्ती गेली अशा भावनेने प्रत्येक व्यक्ती बोलत होती. अनेकांनी संताप व्यक्त केला.
राष्ट्रभाषा भवनात श्रद्धांजली सभा घेण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत मनोहर सभेच्या अध्यक्षस्थानी  होते. डॉ. वि.स. जोग, सुरेश खैरनार, हरिभाऊ केदार, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, विद्या गौरी, डॉ. पांडे, तीर्थराज कापगते, नंदा खरे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वच वक्तयांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला. तसेच राज्याच्या धोरणावरही टीका करण्यात आली.
जर राज्यात सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित नसतील तर ती एक चिंतेची बाब आहे, असे मत यावेळी सर्वानी व्यक्त केले. सभेनंतर राष्ट्रभाषा भवनापासून तर व्हरायटी चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढण्यात येऊन दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.