कुकडीचे पाणी व दुष्काळावरून श्रीगोंदे तालुक्यात दोन्ही काँग्रेसची एकमेकांवर पुन्हा चिखलफेक सुरू झाली आहे. भाजपने मात्र या दोन्ही पक्षांना दोषी धरून त्यांच्याविरूध्द आंदोलन सुरू केले आहे.
कुकडी कारखान्याचे संस्थापक कुडंलिकराव जगताप यांनी उशिरा  आवर्तन सोडल्याबद्दल पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच सिध्देश्वर देशमुख यांनीही पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांना लक्ष्य केले. पालकमंत्री काँग्रेस कार्यकर्त्यांना दमबाजी करतात असा आरोप त्यांनी केला.   
त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मनसुके यांनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या नावार काँग्रेसचे काही दलाल प्रत्येक जनावरा मागे १०० रूपये घेऊन लाखो रूपये गोळा करीत असून हे षडयंत्र पालकमंत्री पाचपुते यांनी उघडकीस आणल्याने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे दोन्ही काँग्रेसची ही धुळवड सुरू असतानाच भाजपचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी आढळगांव येथे रास्ता रोको आंदोलन करून दोन्ही काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.