आदिमायेच्या शारदीय नवरात्रोत्सवास शनिवारपासून सप्तशृंग गडावर सुरूवात होत असताना या तीर्थस्थानाचे दिवसेंदिवस बदलणारे स्वरूप भाविकांसाठी सहाय्यकारी ठरत आहे. काही वर्षांपूर्वी आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांना करावी लागणारी कसरत अलीकडील काळात मोठय़ा प्रमाणावर कमी झाली असून, हे तीर्थस्थान विकासाच्या वाटेवर असल्याने भाविकांना इतरही अनेक सुविधा सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत.
१९७० ते १९८० च्या दशकात खऱ्या अर्थाने सप्तशृंग गडाच्या विकासाला सुरूवात झाली. पूर्वी येथे स्थानिक विश्वस्त मंडळ होते. अंतर्गत वादामुळे शासनाने त्यावर आपले नियंत्रण आणून या देवस्थानाचा विकास करण्याच्या दृष्टिने पाऊल उचलले. पूर्वी देवी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ पायवाट होती. वणीमार्गे गणेश मंदिर, रडतोंडीचा टप्पा आणि दुसरा नांदुरी मार्गे पायवाट होती. मरकडेय पर्वताला लागून आणखी एक पायवाट होती. परंतु यामार्गे येणाऱ्या भाविकांची संख्या किरकोळ असे. या पायवाटेचे रूपांतर कालौघात चांगल्या रस्त्यात झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळासह खासगी वाहनांची ये-जा होऊ लागली.
भौगोलिक क्षेत्राचा विचार करता हा परिसर, थंड हवा आणि अधिक पर्जन्यमानाचा आहे. या परिसरात वनौषधी देखील मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. १९८० ते १९९० च्या दशकात प्रारंभी छोटय़ा मीनी बसेस गडावर जात होत्या. कालांतराने रस्ता रूंदीकरणानंतर मोठय़ा बसेसही धावू लागल्या. १० किलोमीटरचा हा रस्ता घाटाचा आहे. उत्सव काळात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागत असल्याने खासगी वाहनधारक गडावर दर्शनासाठी भाविकांना लवकर पोहोचविण्याच्या नादात आपले वाहन इतरांपेक्षा पुढे दामटविण्याचा प्रयत्न करू लागली. यामुळे निर्माण होणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेत अपघात होणे, घाटात अडथळा निर्माण होऊन कित्येक किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागत. या सर्व परिस्थितीचा विचार करून २० व्या शतकाच्या प्रारंभी शासनाने गडावर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना उत्सव काळात प्रवेश बंद केला. त्यातून फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ांना वगळण्यात आले. त्यामुळे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन सर्वाना सुरळीत दर्शन कमी वेळात होऊ लागले.
चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव हे गडावरील मोठे उत्सव. एरवी बाराही महिने भाविकांची वर्दळ गडावर असते. पूर्वी उत्सव काळात नियोजन करणे, प्रशासनाला जिकरीचे होते. आता उपलब्ध सुविधांमुळे प्रशासनाचा त्रासही बऱ्याच प्रमाणावर कमी झाला आहे. या काळात गडावर भाविकांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची प्रमुख समस्या होती. विश्वस्त मंडळाने मोठय़ा प्रमाणात धर्मशाळा बांधून निवासाची व्यवस्था केली. पूर्वी ‘धोंडय़ा-कोंडय़ा’च्या विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणले जाई. नंतर भवरी नाल्यावर बंधारा बांधून पाण्याच्या समस्यावर उपाय योजण्यात आला. त्याचीही अपूर्णता वाटू लागल्यातर गडाच्या पायथ्याशी असलेल्या बंधाऱ्यांमधून पाणी वर आणून भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते. विश्वस्त मंडळाने उत्सव काळात शेगाव देवस्थानच्या धर्तीवर येथे भोजन व्यवस्था केली आहे.
भाविकांना गडावर दुतर्फा व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागे. नगररचना विभागाने तयार केलेल्या आराखडय़ानुसार व्यावसायिकांना व्यवसाय थाटण्यास सुरूवातीला विरोध केला होता. परंतु प्रशासनाच्या कठोर भूमिकेसमोर त्यांना नमते घ्यावे लागले. यामुळे रस्ते व्यवस्थित झाले. पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पायऱ्यांवर शेवाळ जमून त्या निसरडय़ा होत. त्यामुळे पायऱ्यांवरून भाविकांचे पाय निसटत. हे टाळण्यासाठी पायरी मार्गावर पत्रे टाकण्यात आले. पाच वर्षांपूर्वी मंदिरालगत कोसळलेली दरड आणि वारंवार लहानसहान दरडी पडण्याच्या भीतीने मंडळाने पायऱ्यांवर मजबूत गोलाकार सिमेंटचे छत उभारले. भाविकांची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून या उपाय योजना केल्या गेल्या. मंदिरालगत असलेल्या डोंगरावरून दगड कोसळू नये याकरिता लोखंडी जाळीने ते पक्के करण्यात आले आहेत. फर्निक्युलर ट्रॉलीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची सोय होऊ शकेल. मध्यंतरी वैष्णोदेवी मंदिराच्या धर्तीवर सप्तशृंग गडावर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणून कागदी पिशव्या देण्याचा विचार झाला होता. परंतु तो वास्तवात आला नाही. भाविकांसाठी शिवालय तलाव, सतीचा कडा, सप्तशृंग गडावरील प्रदक्षिणा मार्ग या स्थळांकडे जाण्यासाठी दोन वेगवेगले रस्ते करण्यात आले आहेत.
वणीची देवी म्हणून सप्तशृंग गडाचा उल्लेख होतो. वणी येथे महामार्गालगत भाविकांसाठी धर्मशाळा बांधल्यास लांबून येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होऊ शकेल.