ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवायचा असेल तर केवळ ठाण्यातून मिळणाऱ्या मतांच्या रसदेवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही याविषयी शिवसेना नेत्यांना उशिरा का होईना उपरती झाली आहे. म्हणूनच सुमारे साडेतीन लाखांहून अधिक मतदार असलेल्या मीरा-भाइंदर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींची मनधरणी करण्यास शिवसेना नेत्यांनी सुरुवात केली आहे.
या भागात अगदी महिनाभरापूर्वी भाजपला वाकुल्या दाखविणाऱ्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नमते घ्यावे लागले आहे. भाइंदर परिसरातील भाजपची ताकद लक्षात घेता येथील भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मातोश्रीवर बोलावून घेत त्यांच्यासमोरच महापालिकेत मेहता यांना असहकार करणाऱ्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी मेहतांच्या मागे शिवसेनेची ताकद उभी केली जाईल, असा शब्दही उद्धव यांना या वेळी द्यावा लागल्याचे वृत्त आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात बेलापूर, ऐरोली, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा आणि मीरा-भाइंदर असे विधानसभेचे सहा मतदारसंघ मोडतात. मागील लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईतून सुमारे ३२ हजार तर भाइंदरमधून २३ हजार मतांचे भरघोस मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा विजय झाला होता. विजय चौगुले यांच्यासारखा वादग्रस्त उमेदवार उभा करून शिवसेनेने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता.
यंदा मात्र ठाण्यात विजय मिळविण्यासाठी शिवसेनेने हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आणि भाइंदरमधून संजीव नाईकांचे मताधिक्य कमी करता येईल का, यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे.
भाजपची मनधरणी
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मीरा-भाईदर महापालिका क्षेत्रातून भाजपचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. गेल्या काही दशकांमधील भाजपची या भागातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. महापालिका निवडणुकीत भाइंदर परिसरातील गुजराथी-मारवाडी समाजाची मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपला यश मिळाले होते. महापालिकेत भाजप-शिवसेनेच्या ४२ नगरसेवकांची युती असली तरी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या धरसोड वृत्तीमुळे येथील भाजपचे नेते नरेंद्र मेहता कमालीचे अस्वस्थ आहेत.
उत्तन परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सकवार येथे स्थलांतरित क रण्याच्या अतिशय प्रतिष्ठेच्या प्रस्तावावर शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी अनुपस्थितीत राहात राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरीत्या मदत केली होती. मध्यंतरी भाजपच्या भाइंदर पश्चिम परिसरातील एका विभाग अध्यक्षाला शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. या आणि अशा घटनांमुळे मेहता आणि मंडळी शिवसेनेवर कमालीचे नाराज असून त्यामुळे राष्ट्रवादीत मात्र उत्साहाचे वातावरण होते. ठाण्यातून शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनी मेहता यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही असफल ठरला. भाइंदरची धुरा खांद्यावर घेणारे शिवसेनेचे काही प्रतापी आमदार भाजपशी अडूनच वागत होते. भाइंदरमध्ये भाजपने काम केले नाही तर काही खरे नाही, हे लक्षात येताच थेट उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत भाइंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावून घेतल्याचे वृत्त आहे.
या बैठकीत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मेहता यांच्यासमोरच समज देताना विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचा शब्दही त्यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत करा. या मदतीची सव्याज परतफेड आम्ही करू, असा शब्द उद्धव यांनी दिल्यानंतर इतके दिवस नाराज असलेल्या नरेंद्र मेहता यांची कळी खुलल्याचे बोलले जाते.