चाकरमान्यांना त्यांच्या घरच्या जेवणाचा डबा पोहोचविण्याचा व्यवसाय करणाऱ्या आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ज्यांच्या कामाचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या डबेवाल्यांच्या व्यवसायाने नुकतेच १२५ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना डबेवाल्यांनी आपल्या पुढील पिढीला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय ठेवले आहे..
आम्ही या व्यवसायात आलो. पण आमच्या मुलांनी, नातवांनी या व्यवसायात न येता उच्चशिक्षण घ्यावे आणि आपली वेगळी वाट चोखाळावी, अशी डबेवाल्यांची भावना आहे. ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’चे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, आमचे किंवा आमच्या वडिलांचे फारसे शिक्षण नसल्याने आम्ही या व्यवसायात आलो. या व्यवसायाने आम्हाला नावलौकिक आणि प्रसिद्धी दिली. पण आर्थिकदृष्टय़ा म्हणावा तसा फायदा झाला नाही. आमच्यातील काही जणांना शिक्षणाची आवड होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. आमच्या वेळची परिस्थितीही वेगळी होती. आज जग झपाटय़ाने पुढे चालले असून शिक्षण ही अत्यावश्यक आणि गरजेची बाब झाली आहे. त्यामुळे आमच्या डबेवाल्यांच्या पुढील पिढीने त्यांना ज्या विषयात रुची आहे, त्या विषयाचे शिक्षण घ्यावे, असे आम्हाला वाटते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत आम्ही आमच्या पुढील पिढीचे शिक्षण या विषयावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहोत.
नव्या पिढीने शिकावे आणि विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावा, अशी आमची इच्छा आहे. आमच्या मुलांना त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार कोणते शिक्षण देता येईल, याचा विचार करून जास्तीत जास्त मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. त्यासाठी स्वयंसेवी संघटना, शिक्षणतज्ज्ञ, यांची मदत घेऊन या मुलांसाठी कोणती क्षेत्रे उपलब्ध होऊ शकतील, त्याची माहिती या मुलांपर्यंत पोहोचविणार आहोत. आम्हा डबेवाल्यांचीही मुले हुशार आहेत, असे तळेकर यांनी बोलून दाखविले. येत्या ऑगस्ट महिन्यात डबेवाल्यांच्या कुटुंबियांसहित एक मोठा मेळावा मुंबईत आयोजित करण्याचाही आमचा विचार असल्याचे तळेकर यांनी सांगितले.