गोष्ट कटू खरी, पण सांगणे आवश्यक अशी आहे. प्रसारमाध्यमांनी तर सांगायलाच हवी अशी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे थोर नेते खरेच! मात्र शहरात त्यांचे स्मारक उभे करण्याची व तेही मनपा इमारतीला त्यांचे नाव देण्याची जी काही घाई महापालिकेच्या पदाधिकारी व सन्माननीयांनी चालवली आहे ती त्यांच्या थोरवीला कमीपणा आणणारीच आहे. यात बाळासाहेबांविषयीचे ममत्व कमी व राजकारणच जास्त दिसते आहे. मनपाच्या इमारतीतून जे काही चालते त्याची पुरेपूर कल्पना असल्याने खुद्द साहेबांना तरी त्यांचे हे स्मारक मानवले असते का, याचीच शंका आहे.
मनपातील युतीच्या सत्तेचा प्रमुख घटक पक्ष शिवसेना आहे. भाजप सत्तेत असला तरीही नावापुरता आहे. सत्ता राबवताना त्यात त्यांचा फारसा सहभाग असत नाही. त्यामुळेच मनपा इमारतीला साहेबांचे नाव देण्याच्या विषयापासून भाजपचे नगरसेवक अलिप्त राहिले आहेत. ऐनवेळी सभागृहात ते या विषयावर काय भूमिका घेतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. तेही बहुधा ती ऐनवेळीच जाहीर करतील असे दिसते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहेबांच्याच नाही तर नामकरण व पुतळे अशा स्मारकांबाबतचे मत सर्वश्रूत आहे, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांचे काय म्हणणे आहे तेही महत्वाचे आहे.
मनपाची नवी इमारत मुळीच प्रेक्षणीय वगैरे नाही. तिच्यात काहीही वैशिष्टय़पूर्ण नाही. असलेच तर त्या इमारतीत अनेक दोष आहेत. एखाद्या सार्वजनिक संस्थेचे कार्यालय म्हणून तिची रचना अत्यंत दोषपूर्ण आहे. त्यातील दालने अत्यंत चुकीची, लहान आकाराची, पुरेसा सूर्यप्रकाश मिळणार नाही अशी आहेत. एखाद्या इस्पितळाची असावी अशीच या इमारतीची रचना आहे. रस्त्यापासून ती खाली, जवळपास खड्डय़ातच आहे. मूळ आराखडा ४ मजल्यांचा आहे, सध्या दोनच मजले झाले आहेत, तरीही आता तिच्यावर आणखी मजला उभा राहू शकणार नाही, असे सांगितले जाते.
त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेबांच्या दृष्टीने शत्रूवत असलेल्या काँग्रेसच्या राजवटीत झाली. त्यात भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड शिवसेनेनेच केली होती. आता मनपात सेनेची सत्ता आहे. त्यामुळेच की काय पण या इमारतीबाबतचे सर्व आक्षेप गुंडाळून ठेवत तिला साहेबांचे नाव देण्याची मागणी करण्याची स्पर्धाच सेनेच्या नगरसेवकांत सुरू झाली आहे. काही मतभेदांमुळे सेनेपासून बरेचसे बाजूला झालेल्या बाळासाहेब बोराटे यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती. त्यावेळी त्यात अर्थातच त्यांचे राजकारण होते, मात्र आता साहेबांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मागणीला महत्व आले आहे. ते त्यांना मिळू नये म्हणून की मग सेनेचे संभाजी कदम व अन्य काही नगरसेवकांनीही लगेचच पत्र देत हीच मागणी केली आहे.
काहींनी पाईपलाईन रस्त्याला त्यांचे नाव द्यावे असे सुचवले आहे. निष्ठावान सैनिकावर अन्याय झाले या कारणापोटी वेगळी भूमिका घेणाऱ्या नगरसेवक सुभाष लोंढे यांनी तर मनपाच्या आवारात साहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी मागणी करून सर्वावर कडी केली आहे. या सर्वाच्या किंवा कोणाच्याच मनातील साहेबांबाबतच्या भावना खऱ्याच असणार, यात काही वाद नाही. साहेबांचे काम, कर्तृत्व, विचारांवरची निष्ठा, राष्ट्रभक्तीची तळमळ हे सगळेच अत्यंत गौरवशाली व उत्तुंग होते यात काही शंकाच नाही, म्हणूनच त्यांच्या स्मारकाचा विचार करताना तो किमान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरी गांभीर्याने करायला हवा. रस्त्याला किंवा सार्वजनिक संस्थेच्या कार्यालयाला त्यांचे नाव देणे हा म्हणजे साहेबांना लहान करण्याचा प्रकार होईल.
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत हा विषय घेण्यात आला त्याअर्थी तो मंजूर करायचा असा सेनेचा निर्णय नक्की झाला असावा. या इमारतीचे दोष तर वर सांगितलेच आहेत. शिवाय मनपावर अनेक मोर्चे येत असतात. साहेबांचे नाव असलेल्या इमारतीवर असे मोर्चे येणे शिवसैनिकांना आवडेल का? त्याशिवाय कामगार संघटना, अन्यायग्रस्त असलेले अनेकजण उपोषणाला बसतात, धरणे धरतात. ठाकरे यांचे नाव इमारतीला दिले म्हणून हे सर्व थांबणार थोडेच आहे. मग यात स्मारकाचे स्मारक म्हणून औचित्य राखले गेले असे म्हणता येईल का?
यापेक्षा कितीतरी चांगल्या अर्थाने स्मारक उभे करता येणे शक्य आहे. होतकरू, गरीब मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणारी नगर मनपा ही राज्यातील एकमेव मनपा आहे. या केंद्राला चांगली इमारत नाही. मनपाच्या मालकीचा सावेडीत एक मोठा भूखंड आहे. त्यावर या केंद्रासाठी एक मोठी इमारत बांधण्यात येऊन त्या इमारतीला साहेबांचे नाव दिले तर ते स्मारक चिरंतन राहील. या इमारतीसाठी किमान ६० ते ७० लाख रूपये लागताहेत. मनपा स्वत: ते उभे करू शकत नाही, अन्य लोकप्रतिनिधी ते द्यायला तयार नाहीत, जिल्हा नियोजनमधून या इमारतीला पैसे देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची तयारी नाही, अशा स्थितीत साहेबांचे नाव त्या इमारतीला द्यायचे म्हटले तर क्षणात पैसे उभे राहतील. तेवढे त्यांचे नाव निश्चितच मोठे आहे. केंद्रातून अधिकारी म्हणून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या हृदयावरच साहेबांचे नाव कोरले जाईल व हे स्मारक चिरंतन
होईल.
राजकीय नेता म्हणून शिवसेनाप्रमुखांची थोरवी वादातीत व अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा वेगळी आहेच, पण त्याहीपेक्षा जगातील पहिल्या १० व्यंगचित्रकारांच्या यादीत त्यांचा समावेश होत होता, ही बाब त्यापेक्षाही महत्वाची आहे. व्यंगचित्रांची एखादी राज्यस्तरीय स्पर्धा कायमस्वरूपी सुरू करता आली तर त्यापेक्षा दुसरे उचित स्मारक होणारच नाही. त्यांची क्रिकेटची आवड सर्वश्रूत आहे. क्रिकेटची अकादमी सुरू करून किंवा त्याचीही राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन शिवसेनाप्रमुखांच्या नावे करंडक देण्यास सुरूवात केली तर त्यातूनही अनेक खेळाडू तयार होतील. रचनात्मक काम उभे करणे अवघड असते. म्हणूनच ते करण्यात आनंद असतो. असा आनंद घ्यायचा की एखाद्या इमारतीला, रस्त्याला त्यांचे नाव देऊन घाई करायची याचा निर्णय सेनेच्या शहरातील धुरिणांनी, मनपातील पदाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे.
काय हे!
बाळासाहेबांना इतिहासाची आवड होती, शिवाजी महाराज त्यांचे प्रेरणास्थान होते, हे ठिक आहे, पण तेवढेच लक्षात घेऊन सेनेच्या एका संघटनात्मक पदाधिकारी महिलेने नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला साहेबांचे नाव द्यावे अशी मागणी केली. इमारतीला, रस्त्याला साहेबांचे नाव द्यावे ही मागणीही त्या महिला पदाधिकाऱ्याच्या मागणीपेक्षा वेगळी नाही हे मनपातील पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
स्मारक की, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना मारक?
गोष्ट कटू खरी, पण सांगणे आवश्यक अशी आहे. प्रसारमाध्यमांनी तर सांगायलाच हवी अशी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे थोर नेते खरेच! मात्र शहरात त्यांचे स्मारक उभे करण्याची व तेही मनपा इमारतीला त्यांचे नाव देण्याची जी काही घाई महापालिकेच्या पदाधिकारी व सन्माननीयांनी चालवली आहे ती त्यांच्या थोरवीला कमीपणा आणणारीच आहे.
First published on: 27-11-2012 at 02:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smarak or oppose thinking of shivsena chief balasaheb