शिर्डीत कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला असून येथील राजकीय मंडळी स्वार्थासाठी गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याबद्दल कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिर्डीत अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे वाढत असून आता राजकीय किंमत मोजावी लागली तरी हे रोखण्यासाठी शिर्डीत स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचा इशाराही विखे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
येथील संत सावता महाराज मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी हा संताप व्यक्त केला. शिर्डीत विकासाच्या वाढीबरोबरच सामाजिक शांतता झपाटय़ाने कमी होत आहे. भाविकांची हेळसांड होत आहे. गुन्हेगारीचा उपयोग येथील राजकारणासाठी होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विकासाच्या गप्पा मारणारे शिर्डीकर पैशाच्या नादात एकमेकांची ओळख विसरत चालले आहेत, याची आठवण करून त्यांनी आत्मचिंतनाचा सल्ला दिला. शिर्डीचे पावित्र्य बिघडणार नाही, याची काळजी घ्या, नाहीतर पंधरा वर्षांपूर्वीची शिर्डी पुन्हा अनुभवावी लागेल त्यावेळी आपल्याकडे येऊ नका, असा सल्लाही विखे यांनी दिला.
गेल्या पंधरवडय़ातच विखे यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. आता पुन्हा त्यांनी त्याच प्रश्नाला हात घातला. काही प्रतिष्ठित नेते गुन्हेगारांना तुरुंगात पैसे पुरवित असल्याची माहिती आपल्याला मिळाली असून कायदा सुव्यवस्था बिघडल्याबद्दल शिर्डी नगरपंचायतने साधा ठरावसुद्धा न केल्याने विखे यांनी नाराजी व्यक्त केली.