राज्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्यासाठी नवीन विहिरींचे अधिग्रहण करणे, तसेच तीनशे फुटांपेक्षा अधिक खोलीपर्यंत विंधन विहिरी खोदण्यासाठी मंजुरीची मागणी होत असून त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. राज्यातील १४ जिल्ह्य़ांमध्ये दुष्काळाची तीव्रता गंभीर असल्याने जनतेला पिण्याचे पाणी देण्यासाठी शेती, उद्योग व बांधकामांचे पाणी बंद करण्यात येणार असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेची गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी प्रा. ढोबळे यांनी जनता दरबार भरविला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. कूपनलिकांवर हातपंपांऐवजी सबमर्सिबल मोटार बसविण्याबरोबरच जुन्या विहिरींतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यात सध्या टंचाईग्रस्त भागात १६०० पेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. जवळपास सर्व जिल्ह्य़ांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांना चारा-पाणी, मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता सर्व जिल्ह्य़ांमध्ये पाण्याचा प्रश्न सतावत आहे. संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, याशिवाय नाशिक, ठाणे आदी भागात पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर आहे. तेथील प्रशासनाला पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचे प्रा.ढोबळे यांनी नमूद केले.
सोलापूरचे पालकमंत्री प्रा. ढोबळे यांनी नवीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम हे रुजू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर टंचाईग्रस्त भागातील जनतेसाठी दरबार भरविला. डॉ. गेडाम हे कडक शिस्तीचे व कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत. यापूर्वीचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या उण्या-पुऱ्या एक वर्षांच्या काळात त्यांना प्रशासनावर पकड ठेवता आली नव्हती. विशेषत: दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या कामात त्यांच्या मर्यादा लक्षात आल्या. राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन झुकत असल्याच्या तक्रारी वाढल्या असतानाच मवारे यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तडकाफडकी बदली केली व नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. गेडाम यांना पाठविले. यासंदर्भात बोलताना, मवारे यांची कारकीर्द चांगली होती. त्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव झाल्याचा दावा प्रा. ढोबळे यांनी केला.