विवेकानंद संस्कार संस्थेच्या पुढाकारातून लातूर शहरात लोकसहभागातून स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. रविवारी त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विवेकानंदांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित देशमुख होते.
स्वामी विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीनिमित्त देशभर राष्ट्रीय युवक दिन साजरा होत असताना या दिवशी लातूरकरांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. विवेकानंद चौकात झालेल्या स्वामीजींच्या पूर्णाकृती पुतळय़ावर उपस्थितांनी गुलाबपाकळ्यांची उधळण करीत भारतमातेच्या घोषणांचा निनाद केला. रा. स्व. संघाच्यावतीने १५१ घोषवादकांनी मानवंदना विवेकानंदांना दिली. डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांनी विवेकानंदांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेतला. स्वामीजींचा केवळ पुतळा उभारून चालणार नाही तर त्यांच्या कार्याचे व विचाराचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
डॉ. देवव्रत आचार्य यांनी प्रांतवाद, भाषावाद यामुळे देशाच्या सीमा असुरक्षित व संकुचित होत आहेत. युवकांमध्ये स्फुिल्लग चेतवण्यासाठी विवेकानंदांच्या विचाराचा जागर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वामी विवेकानंद हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून लातुरातील पुतळा हा केवळ शोभा वाढवण्यासाठी उभारण्यात आला नसून सर्व देशवासियांना अभिमान वाटावा, अशी लातुरातील ही घटना आहे. या पुतळ्य़ापासून नवी पिढी नव्या दिशा घेईल, असा विश्वास डॉ. अशोक कुकडे यांनी व्यक्त केला. आमदार वैजनाथ िशदे, अ‍ॅड. संजय पांडे, प्रा. नरेंद्र पाठक यांचेही समयोचित भाषण झाले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुमुदिनी भार्गव व सुधन्वा पत्की यांनी केले.