विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. त्यांनी ‘संगीत कल्पतरू’ या ग्रंथाचे संपादन केले, तसेच सुमारे एक हजार गीतांची रचना केली. त्यांचे विश्वव्यापी कार्य, हिंदुत्वाबद्दलचे आग्रही विचार व हे सर्व अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात, यातच त्यांचे अलौकिकत्व स्पष्ट होते, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार व स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती-महाराष्ट्रचे प्रदेश कार्यवाह सुधीर जोगळेकर यांनी काढले.
‘स्व’विकास केंद्रातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ‘स्व’विकास दिनदर्शिका २०१३-१४’च्या प्रकाशनप्रसंगी जोगळेकर बोलत होते. जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोप समितीचे सदस्य आर. सी. बाफना, नगरसेविका साधना सुरडकर या वेळी उपस्थित होते. आपल्याला इतरांपासून तोंड लपवावे लागेल, असे काम आपल्या हातून घडू नये, तसेच आपले पोट भरण्यासाठी इतर कोणाचा जीव घेऊ नये, असे सांगत आर. सी. बाफना यांनी शाकाहार व शुद्ध चारित्र्य याचे महत्त्व विशद केले. ‘स्व’विकास केंद्राचे संचालक श्रीकांत काशीकर यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रातर्फे या वेळी करण्यात आला.