गेले काही दिवस महिला आणि संस्कृती याबद्दल विविधांगी वाचन करते आहे. यात काही चांगल्या गोष्टी होत्या तर काही मनाला न पटणाऱ्या. पण हे वाचता वाचता सहज एक बातमी नजरेस पडली ज्याचं हेडींग होतं “बाबा रामदेव यांचे पुन्हा महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य”. बातमी क्लिक केली. बाबा रामदेव यांचं वक्तव्य होतं… “महिला साडी नेसल्यावर चांगल्या दिसतात, त्या सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि त्यांनी काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या शेजारी बसल्या होत्या. बाबा रामदेव यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. ही बातमी वाचल्यानंतर एक तिडीक डोक्यात गेली आणि अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना थेट काही प्रश्न विचारावेसे वाटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या देशाची साधारण लोकसंख्या ही एक अब्ज ३९ कोटी इतकी आहे. यात महिलांची संख्या 48 टक्के तर पुरुषांची ५२ टक्के आहे. म्हणजे साधारणपणे सम प्रमाण असे म्हणता येईल. पण उठसूट काहीही झालं तरी महिलांविषयीच वादग्रस्त वक्तव्य का केली जातात? पुरुषांसंबंधित विषयांवर काहीही वक्तव्य का केली जात नाहीत? निव्वळ काही दिवसांच्या प्रसिद्धीसाठी हे सर्व केलं जातं का? की पुरुषांवर वक्तव्य केल्यावर प्रसिद्धी मिळणार नाही, म्हणून महिलांना टार्गेट केलं जातं? असे एक ना अनेक प्रश्न सहज मनात आले.

काही महिन्यांपूर्वी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांबद्दल अशाप्रकारे वक्तव्य केले होते. “अनेक महिला या फाटलेली जीन्स वापरतात. याचे मुलांच्या मनावर काय संस्कार होतील? चांगले संस्कार करण्याची जबाबदारी पालकांवर असते. एखाद्या स्वयंसेवी संस्थेत काम करणारी महिलाच असे कपडे परिधान करत असेल तर समाजावर होणारे संस्कार कसे असतील?” असे त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. तर त्यापूर्वी “राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात”, असे वक्तव्य व्यसनमुक्तीचे ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केले होते. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

इतकंच काय तर हल्लीच दोन आठवड्यांपूर्वी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी टिकलीवरुन एका महिला पत्रकाराला फटकारल्याची बातमीही वाचली. “एक महिला पत्रकार तिच्या कामाचा भाग म्हणून प्रश्न विचारण्यासाठी संभाजी भिडेंकडे गेली होती. पण त्यांनी तिला तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो”, असे म्हणत जवळपास हाकलून दिलं. यावरुन वाद झाला होता. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले होते. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ,” असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद सुरु झाला होता. महिला आयोगाने तर कारवाईचे पत्रही पाठवले. पण आठ- दहा दिवस गेले त्यात, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याने माफी मागितली आणि मग हा विषय कायमचा बंद झाला. यानंतर कोणी त्यावर एक अवाक्षरही काढले नाही.

पण स्त्री म्हणून सामाजिक स्तरावर स्थान असलेल्या तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारावासा वाटतोय… काहीही झाले तरी महिलांबद्दलच का बोललं जातं? महिला, त्यांची संस्कृती, त्यांचे कपडे एक ना अनेक मुद्द्यावर महिलांना बोल लावले जातात. महिला म्हणजे काही खेळणं वाटतात का? आज तुमची भाषणं लाखो लोक ऐकत असतात. तुमच्या विचारांचा आदर्श प्रत्येकजण ठेवत असतो. मग या अशा वादग्रस्त विधानांमुळे तुम्ही पुढच्या पिढीपुढे महिलांबद्दल कोणता आदर्श ठेवत आहात याचा कधीतरी विचार करता का? की मग फक्त उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?

हीच वादग्रस्त विधान करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरात असलेली आई, बहीण, मुलगी, बायको किंवा मैत्रीण आठवत नाही का? तिला उद्देशून तुम्ही ते बोलू शकता का? तिथे तुमची हिंमत का होत नाही? त्या तुमच्या घरातल्या स्त्रिया आहेत. मग अवघे विश्वची माझे घर असं एकीकडे म्हणता आणि दुसरीकडे देशभरात वावरणाऱ्या स्त्रियांबद्दल अशी वादग्रस्त वक्तव्य करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही?

आणखी वाचा : आलियाला लग्नाआधीच गरोदर म्हणणाऱ्या ट्रोलर्सना चपराक

आम्ही लहान असताना कोणीही यावे टपली मारुन जावे, असा खेळ खेळायचो. आता महिलांच्या बाबत तोच खेळ खेळला जातोय असं वाटतं. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी महिलांबद्दल एखादे वाक्य बोलायचे. मग मीडियावाले तुमच्या बातम्या छापणार, २४ तास तुम्ही टीव्हीवर झळकणार, पुढे काही दिवस तुमच्याच नावाची चर्चा सर्वत्र दिसणार. काही दिवसांनी महिला आयोग तुम्हाला नोटीस पाठवणार. अनेक नेते मंडळी तुमच्याबद्दल बोलणार आणि मग काही दिवसांनी तुम्हाला उपरती होणार असे तुम्ही भासवत एखादी पत्रकार परिषद आयोजित करणार… हा खेळ चाललाय का? मध्यभागी महिलाच… फक्त खेळणारे पुरुष बदलतात!

त्यात तुम्ही जे वाक्य बोलणार तेही फिक्स असतं बरं का? “मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही महिलेचे मन दुखावलं जाईल, असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. माझ्या बोलण्याने महिलांची मनं दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो. पण माझा तो हेतू नव्हता…”, असं बोलल्यानंतर तुमच्याबद्दलच्या तक्रारी तशाच धूळखात पडून राहणार. कोणीही त्याबद्दल पुढे काहीही बोलणार नाही. पण तुमच्या या काही दिवसांच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक वेळी महिलांचाच बळी का दिला जातो?

आपल्या समाजात पुरुष मंडळीदेखील आहेत. त्यांच्याबद्दल कोणी काही वादग्रस्त बोललेलं माझ्या तरी ऐकिवात नाही. जरी तसं काही असेल तरी त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही. आता रामदेव बाबा “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात” असं काहीसं बरळले. त्याऐवजी ते महिलांना चांगले सल्ले देऊ शकले असते, त्यांनी महिलांना योगामुळे कसे सौंदर्य वाढते, त्याचे फायदे काय- तोटे काय, हे सांगितलं असतं तर आनंदाने महिलांनी ते वाचलं असतं. पण तरीही त्यांनी संधी साधू प्रमाणे चर्चेत राहण्यासाठी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. तिथे अमृता फडणवीसही बसल्या होत्या. पण त्यांनीही याबद्दल अवाक्षरही काढलं नाही किंवा त्यांना रोखलंदेखील नाही, वर त्या हसत होत्या, याचाच मला जास्त राग आला. एक व्यक्ती स्त्रीबद्दल अपशब्द वापरतोय आणि दुसरी स्त्री ते बाजूला बसून ऐकत असतानाही गप्प बसते.

आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

अमृता ताई, जर तुमच्याऐवजी मी तिथे असते तर नक्कीच त्यांना याबद्दल जाब विचारला असता. महिलांच्या विरोधात विधान केल्यानंतर प्रसिद्धी आपोआपच मिळते हे गणित हल्ली अनेकांनाच ठाऊक झालं आहे. त्यामुळेच की काय महिलांबद्दल इतक्या सहजतेने वक्तव्य केली जातात. पण तुम्ही एक स्त्री म्हणून तिथेच माईक हातात घेऊन रामदेव बाबांना ते वक्तव्य चुकीचं आहे असं सांगितलं असतं, त्यांना दोन शब्द बोलला असता, तरी सर्व महिला या तुमच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिल्या असत्या. तुम्ही जगभर भारताचे नेतृत्व करता आणि तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती महिलांबद्दल असे वक्तव्य करते. तुम्ही ते ऐकून घेता हेच मुळात पटत नाही. पण या वक्तव्यानंतर २४ तास उलटून तुम्ही त्यावर सारवासारव करणारे उत्तर दिले. केवळ एक वाक्य बाबा रामदेव यांना व्यवस्थित मांडता आले नाही. नेमक्या याच वाक्यावरून गोंधळ निर्माण झाला, असे तुम्ही म्हणालात. पण तुम्ही दिलेले हे उत्तर तुमच्या मनाला तरी पटलंय का? याचा नक्कीच विचार करा.

आता काही तासांनी रामदेव बाबांनी महिला आयोगाला पत्र पाठवत त्यांचा माफीनामा सादर केला. त्यात त्यांनी “महिलांचा अपमान करण्याचा कोणताही माझा हेतू नव्हता. महिला सशक्तीकरणाच्या संदर्भात मी ठाण्यातील कार्यक्रमात उपस्थित होतो. मात्र त्यावेळी केलेल्या विधानाची काही सेकंदांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून चुकीचा अर्थ लावण्यात आला. महिलांच्या वस्त्रांच्या संदर्भात मी बोललो, त्याचे तात्पर्य साध्या वस्त्रांसंदर्भात (पेहराव) होता. तरी या विधानामुळे कुणाचा अपमान झाला असेल तर माफी मागतो. मी खेद व्यक्त करत आहे”, असे त्यांनी यात म्हटले. या माफीनाम्यानंतर आता हे प्रकरणही शांत झाल्यातच जमा आहे. ज्याप्रकारे भिडे गुरुजी यांचे टिकली प्रकरणाचा वाद मिटला, त्याची चर्चा बंद झाली, तसा हा वादही मिटेल.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

पण तुम्ही केलेली ही वक्तव्य तुमच्या आई, मुलगी, मामी, मावशी, बहिण, काकू किंवा इतर घरातील-कुटुंबातील स्त्रियांसमोर करू शकता का? असा प्रश्न मी तुम्हाला एक स्त्री म्हणून विचारु इच्छिते. जर त्याचं उत्तर नाही असेल तर मग इतर महिलांबद्दल बोलताना तुम्हाला जनाची नाही तर मनाचीही लाज का वाटत नाही? तुमच्यासाठी महिला म्हणजे खेळणं आहेत का? प्रसिद्धी कमी झाली म्हणून त्याचा वापर केला आणि नंतर सोईप्रमाणे ते कचऱ्यात फेकून दिलं. पण एक दिवस याच महिला एकजुटीने उभ्या राहतील आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील हे मात्र नक्की! त्यावेळी तुम्ही केलेल्या वक्तव्याचा जाहीर पाढा वाचला जाईल. त्याचा पश्चातापही तुम्हाला नक्कीच होईल!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdev baba controversial statement about women clothing ladies disrespect comment increase nowdays nrp
First published on: 28-11-2022 at 15:55 IST