संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजी प्रकरणी दोषी ठरलेल्या विंदू दारा सिंगने धक्कादायक खुलासे केले आहेत. विंदूच्या मते आयपीएलमधील खरी स्पर्धा बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन आणि माजी आयपीएल अध्यक्ष ललीत मोदी यांच्यात होती. आम्ही तर काहीच केले नाही. फिक्सिंगच्या चौकशीची संपूर्ण घटना ललीत मोदी आणि श्रीनिवासन यांच्या भोवती फिरली पाहिजे असेही विंदू म्हणाला.
तसेच माझा फिक्सिंगमध्ये काहीच हात नसल्याचे खुद्द पोलिसांनी मला सांगितले पंरतु, शरद पवार साहेबांच्या दबावामुळे आणखी काही दिवस किंवा महिनाभर तुला तुरूंगात रहावे लागेल असे पोलीसच म्हणाले असल्याचा आरोपही विंदूने केला आहे. आयपीएलमध्ये शंभर टक्के फिक्सिंग होते यात संघांचे मालक स्वत: सट्टेबाजी करत होते. विजय मल्ल्यांनीही कोटीच्या-कोटी सट्टेबाजी केली आहे आणि तब्बल २०० कोटींच्या आसपास रोकड जमा केली असल्याचा खुलासाही विंदूने केला. शरद पवार यांच्या देखरेखीखाली ललीत मोदी यांनी आयपीएल स्पर्धा सुरू केली होती. त्यानंतर ललीत मोदींनी शशी थरूर यांनाही आयपीएलमध्ये काँग्रेसचाही कोणीतरी आपल्याबाजूने असवा या उद्देशाने गुंतवणूकदार म्हणून सामील करून घेतल्याचा दावाही विंदूने केला आहे.
विंदूने शरद पवारांबद्दल केलेले शेवटचे विधान प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे. विंदू म्हणाला, शरद पवार तर ‘महान’ व्यक्ती आहेत. उद्या एखाद्या माध्यमाने त्यांच्याविरोधात ससेमिरा चालू केला तर, त्यांच्या पाठिंब्यातील काही प्रवृत्ती ते माध्यमच बंद पाडण्यास भाग पाडतील असेही विंदू म्हणाला.