पाणीपुरवठय़ाबाबत स्वयंपूर्णतेसाठी मुंबईत नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची तयारी

सार्वजनिक क्षेत्रातील ‘मिनी रत्न’ श्रेणीतील कंपनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेडने आगामी वर्षांत देशांतर्गत व्यावसायिक विस्ताराच्या दृष्टीने एकंदर सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये भांडवली गुंतवणुकीची योजना आखली आहे. विदेशात काही संयुक्त भागीदारीतील प्रकल्पाचाही कंपनीचा मानस आहे. लक्षणीय म्हणजे मुंबईतील तुर्भे येथील प्रकल्पाची पाणीपुरवठय़ाची गरज भागविण्यासाठी कंपनीने संयुक्त रूपात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

तुर्भे येथील उत्पादन प्रकल्पाचे कार्य सुरळीतपणे चालविण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न उग्र बनत चालला आहे. विशेषत: उन्हाळ्यातील महिन्यात (मे-जून) मुंबई महानगरपालिकेकडून प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे पाण्याबाबत स्वयंपूर्णतेची गरज ओळखून कंपनीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) तुर्भे येथील विद्यमान एसटीपी प्रकल्पाशेजारीच उभारण्यास सुरुवात केली आहे. हा अंदाजे २०९ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनसह भागीदारीत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरसीएफचे संचालक (वित्त) सुरेश वॉरियर यांनी दिली. २०१९ पर्यंत आरसीएफसह भारत पेट्रोलियमचीही १०० टक्के पाण्याची गरज या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून तयार होणाऱ्या पुनर्वापरास योग्य पाण्यातून भागविली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरसीएफची वार्षिक सर्वसाधारण सभा अलीकडेच संपन्न झाली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी कंपनीचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक आणि वॉरियर यांनी पत्रकार परिषदेत, कंपनीच्या २०१६-१७ मधील आर्थिक कामगिरी तसेच विस्तारासाठी नियोजित प्रकल्पांची माहिती दिली. ओडिशातील तलचेरस्थित कोळशावर आधारित खतनिर्मिती प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, तो लवकरच कार्यान्वित होईल, असे धात्रक यांनी स्पष्ट केले. हा अंदाजे १०,००० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा प्रकल्प आरसीएफ, कोल इंडिया, गेल आणि फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑप इंडिया यांच्याकडून संयुक्तरीत्या उभारला जात आहे. वायुविजन तंत्रावर आधारित २,२०० मे. टन प्रति दिन अमोनिया आणि ३,८५० मे. टन प्रति दिन युरियाचे उत्पादन या खत संकुलातून घेतले जाईल. या प्रकल्पामुळे देशातील युरिया उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळेल, असे धात्रक यांनी स्पष्ट केले.

इराण येथील चाबहार बंदरानजीक १.२७ दशलक्ष टन क्षमतेचा युरिया निर्मितीचा संयुक्त प्रकल्प तसेच अल्जेरिया येथील संयुक्त प्रकल्प अद्याप संकल्पनात्मक पातळीवर असून, त्यांच्या कार्यान्वयनाला आणखी काही अवधी लागेल, असे धात्रक यांनी स्पष्ट केले. कंपनीने गेल्या वर्षभरात व्यावसायिकदृष्टय़ा अव्यवहार्य ठरलेले प्रकल्प पूर्णपणे बंद केले आहेत. त्या परिणामी २०१६-१७ मधील कंपनीचे महसुली उत्पन्न ६ टक्क्य़ांनी घटून ७,२१९.१५ कोटींवर खाली आला असला तरी निव्वळ नफा मात्र आधीच्या वर्षांच्या तुलनेत वाढून १७९.२६ कोटी रुपयांवर गेला आहे.