विम्याचा हप्ता थकल्यामुळे एका महिलेला विम्याच्या पॉलिसीची रक्कम मिळू शकली नाही. या प्रकरणात महिलेने ‘अनवधानाने विमा हप्ता भरावयाचा राहून गेला आणि विमा कंपनीने स्मरणपत्र पाठविणे आवश्यक होते’ असे कारण दिले होते. मात्र, हा बचाव खोडून काढत विम्याची रक्कम मागणाऱ्या महिलेचा अर्ज ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य गीता घाटगे यांनी फेटाळून लावला.. विम्याचे हप्ते नियमित भरले तरच नागरिकांना विमा पॉलिसीची रक्कम मिळू शकते, हे या निकालाने अधोरेखित केले.
शोभा बापू लोहार (रा. पोलके पोट्री, धायरीजवळ, पुणे) यांनी आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी पुणे शाखेविरुद्ध विम्याच्या रक्कम मागणीसाठी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. तो दावा मंचाने फेटाळून लावला आहे. शोभा यांच्या पतीचे निधन झाले. त्यांनी आय.सी.आय.सी.आय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे ‘ सेव्ह अॅन्ड प्रोटेक्ट’ योजनेखाली विमा उतरविला होता. विम्याचा कालावधी फेब्रुवारी २०१२ ते फेब्रुवारी २०२७ असा होता.
पतीच्या मृत्यूनंतर शोभा यांनी सर्व कागदपत्रांसह विम्याची रक्कम मिळावी म्हणून कंपनीकडे अर्ज केला होता. मात्र, विमा पॉलीसीचा एक हप्ता थकीत असल्यामुळे कंपनीने शोभा यांनी मागितलेल्या नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. हप्ता भरायचा राहिल्याबाबत शोभा यांना युक्तिवाद करताना पतीच्या मृत्यूपूर्वी विमा पॉलिसीबाबच काहीच माहिती नव्हती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर बँकेच्या खात्यावरून विमा कंपनीचा हप्ता भरल्याची पावती आढळून आल्यानंतर विमा पॉलिसी संदर्भात समजले. ठरलेल्या हप्त्यापेक्षा त्यांच्या पतींनी ५२ रुपये जास्त कंपनीकडे भरून ती पुढील हप्त्याच्या रकमेपोटी कंपनीकडे जमा होती. त्यामुळे पतीची विमा पॉलिसी बंद अवस्थेत असल्याचा कंपनीचा दावा खोटा आहे. विम्याच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्या दरम्यानच्या कालावधीत अनवधानाने त्यांच्या पतीकडून हप्ता राहिला आहे. अशा वेळी कंपनीने विम्याचा हप्ता भरणेबाबत स्मरणपत्र पाठविण्याची जबाबदारी त्यांची होती. पण कंपनीने कोणतेही स्मरपणपत्र पाठवून त्यांची जबाबदारी टाळली आहे. विमा कंपनीने विम्याची रक्कम नाकारून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्राहक मंचाकडे केली.
याबाबत मंचाने दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून पाहिली. त्यामध्ये तक्रारदार यांच्या पतीने विमा उतरविल्याचे स्पष्ट होते. त्यांनी पहिला हप्ता कंपनीकडे जमा केल्याचे दिसून आले. पहिला हप्ता भरल्यानंतरच मिळणाऱ्या पावतीवर कंपनीकडून दुसऱ्या हप्त्याची तारीख नमूद केलेली असते. हा हप्ता भरण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी असल्याने त्यांनी पुढील हप्ता भरणे आवश्यक होते. त्याचबरोबर कंपनीने स्मरणपत्र पाठविण्याची वाट पाहणे अपेक्षित नाही, त्यामुळे तक्रारदार यांच्या पतीकडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत असल्याचे मंचाने आदेशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2014 रोजी प्रकाशित
अंतिम हप्ता भरायचा राहिला, तरी विम्याची रक्कम नाकारली!
विम्याचा हप्ता थकल्यामुळे एका महिलेला विम्याच्या पॉलिसीची रक्कम मिळू शकली नाही. या प्रकरणात महिलेने ‘अनवधानाने विमा हप्ता भरावयाचा राहून गेला आणि विमा कंपनीने स्मरणपत्र पाठविणे आवश्यक होते’ असे कारण दिले होते.
First published on: 29-04-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sending reminder for installment is not mandatory