औरंगाबाद : सततच्या कर्जमाफीमुळे घेतलेले कर्ज परत करण्याची वृत्ती बदलत चालली असल्याची निरीक्षणे व्यक्त होत असताना थकीत पीककर्जाचे प्रमाण आता १८ टक्क्यांवर गेले आहे. राज्यात ७३ लाख २७ हजार ९८० खात्यांना पीक कर्ज देण्यात आले. आठ लाख ७१ हजार ११ कोटी रुपयांपैकी १६ हजार १०० कोटी रुपये थकीत रक्कम आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील थकीत रकमेचे प्रमाण २२ टक्के असल्याचे बँकांच्या प्रतिनिधींनी नुकतेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना दिली. पीक कर्जाची रक्कम जुनी-नवी करण्यावरच भर असतो. मात्र, वरचेवर कर्ज न भरण्याचा कल वाढण्याचा वेग वाढला असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. थकीत पीक कर्जाचा फटका जिल्हा बँकांना अधिक बसतो. राज्यातील नऊ जिल्हा सहकारी बँक अक्षरश: डबघाईस आलेल्या आहेत. थकीत कर्जातील बहुतांश हिस्सा सार्वजनिक बँका व जिल्हा सहकारी बॅकांचा आहे. सार्वजनिक बँकांकडे आठ हजार ४१९ कोटी तर जिल्हा बँकांचा असून पाच हजार ६४७ कोटी रुपये थकीत असल्याचे दिसून आले आहे. पीक कर्जात नव्या-जुन्या नोंदी होत असल्या, तरी वाढलेला थकीत कर्जाचा आकडा गंभीर असल्याचे सांगण्यात येते. सततच्या कर्जमाफीमुळे कर्ज परत करण्याचा कल बदल्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाडय़ातील नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्याची स्थिती कमालीची खालावली असून नुकतेच उस्मानाबाद जिल्हा बँकेने काही शाखाही कमी केल्या आहेत.